चंद्रकांत पाटील केसांना काळा कलप लावून अंगणातील रणांगणात उतरणार का? : सामना

| Updated on: May 22, 2020 | 8:30 AM

राज्यपालांच्या 'अंगणात' लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे, असा टोलाही लगावण्यात आला आहे (Saamana on BJP Chandrakant Patil Mera Aangan Mera Ranangan Protest)

चंद्रकांत पाटील केसांना काळा कलप लावून अंगणातील रणांगणात उतरणार का? : सामना
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे, आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार का? असा तिरकस सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. भाजप आज ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. (Saamana on BJP Chandrakant Patil Mera Aangan Mera Ranangan Protest)

“सर्व देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करत असताना भाजपला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरु असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरु झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दाचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांमध्ये शहाणपण उरले आहे काय?” असा सवाल विचारला.

हेही वाचा : घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार

“राज्यातील जनतेने शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडत सोशल डिस्टन्सिंग पाळून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन आणि काळे बोर्ड घेऊन सरकारचा निषेध करायचा आहे” असा फतवा चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे. चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे, आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. (Saamana on BJP Chandrakant Patil Mera Aangan Mera Ranangan Protest)

“राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?” असा सवाल करत शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.