लोकशाहीचा चौथास्तंभ कमकुवत करण्याचं कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड : सचिन सावंत

| Updated on: Oct 09, 2020 | 7:44 PM

मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे (Sachin Sawant on TRP racket).

लोकशाहीचा चौथास्तंभ कमकुवत करण्याचं कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड : सचिन सावंत
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे (Sachin Sawant on TRP racket). ते म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे हे कारस्थान आहे. फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचे दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा आहेच. सोबतच भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचाही तो एक भाग आहे.” यावेळी सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेला हा घोटाळा लोकशाहीच्या हितासाठी असून आम्ही त्याचे स्वागत करतो असंही म्हटलं.

सचिन सावंत म्हणाले, “देश पातळीवर लोकशाहीमध्ये जनमानसाचा स्वंतत्रपणे विचार करुन मत ठरवण्याचा अधिकार संपुष्टात आणण्यासाठी त्यांची विचार करण्याची क्षमताच कुंठीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असत्याला सत्य म्हणून दाखवण्यासाठी आणि विरोधी पक्षांच्या सरकारांविरोधात कृत्रिम जनक्षोभ निर्माण करण्यासाठी मोदी सरकारच्या मदतीने एक कुटील कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. यामध्ये मोदी संचालित वाहिन्यांचा मोठा सहभाग आहे. यानुसार मुंबई पोलिसांनी जो घोटाळा उघड केला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राबवणाऱ्या एका वाहिनीने फ्रॉड करुन आपला टीआरपी जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.”

“आम्ही जे दाखवतो ते सत्य आणि आम्ही जे म्हणतो तीच जनभावना हे दर्शवण्याचा प्रयत्न या टीव्ही चॅनलने केला. यामध्ये इतर वाहिन्यांचा टीआरपी कमी झाल्याने सदर वाहिनीवर दाखवलेल्या बातम्या जनतेला आवडतात असा समज होऊन त्याही त्याच बातम्या दाखवण्यास सुरुवात करतात. यातून देशाचं एक चित्र उभं केलं जातं. सुशांत सिंह प्रकरणात हेच घडलं. या टीव्ही चॅनलने सातत्याने सुशांत सिंहची आत्महत्या नसून त्याला मारले गेल्याचं खोटं चित्र बिंबवण्याचा प्रयत्न केला. याला अधिक बळ मिळावे यासाठी सोशल मिडियाध्ये हजारो खोटी फेसबुक, ट्वीटर अकाऊंट आणि यूट्यूब चॅनेल तयार करण्यात आले. यातून अफवा, खोटी माहिती, खोट्या बातम्यांचा प्रचार करण्यात आला,” असंही सचिन सावंत यांनी नमूद केलं.

“खोट्या माहितीच्या आधारावर देशभरात जनक्षोभ असल्याचं वातावरण तयार केलं”

सचिन सावंत म्हणाले, “संबंधित चॅनलने खोट्या माहितीच्या आधारावर देशामध्ये जनक्षोभ आहे आणि तो जनक्षोभ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात आहे अशा प्रकारचे वातावरण तयार केले. तसेच मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंहच्या मृत्यूचा मुद्दा बनवण्यात आला. या खोट्या माहितीवर स्वार होऊन भाजपने आपली राजकीय पोळी भाजून घेतली. हीच कार्यपद्धती पालघर साधू हत्याकांडानंतर वापरलेली पाहायला मिळाली.”

“भाजपच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणित आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेली. त्यामुळेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत. सुशांत प्रकरणात मोदी सरकारच्या दबावामुळेच तीन-तीन राष्ट्रीय तपास यंत्रणा या मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असल्याची जाणीव असतानाही गुंतवल्या गेल्या. एम्स पॅनेलचा रिपोर्ट आल्यानंतर आता या वाहिनीमार्फत चालवलेला अप्रप्रचार खोटा होता हे उघडकीस आले आहे. परंतु भारतीय जनता पक्ष या वाहिनीची गेलेली पत थोड्याफार प्रमाणात सांभाळण्यासाठी आणि बिहारच्या निवडणुकीत काही काळ मुखभंग होण्याचे टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याचा प्रय्तन करत आहे. त्यासाठी सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही सचिन सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या :

सोशल मीडियातून विरोधकांच्या बदनामीचा ट्रेंड हा नवदहशतवादच; काँग्रेसचा भाजपवर हल्ला

मिनिटाला 25 तर महिनाभरात 45 हजार ट्विट केल्याचा दावा, भाजप IT सेलविरोधी पुरावे घेऊन काँग्रेस पोलीस आयुक्तांच्या भेटीला

एनसीबीकडून 59 ग्रॅम गांजाचा गाजावाजा, पण भाजप कार्यकर्त्याकडील 1200 किलो गांजाकडे दुर्लक्ष : सचिन सावंत

Sachin Sawant comment on TRP racket Sushant Singh Rajput Suicide and CBI