Vidhan Parishad Election 2022: सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी, समजुतीचा प्रयत्न की बळीचा बकरा?

| Updated on: Jun 09, 2022 | 11:10 AM

Vidhan Parishad Election 2022: भाजपकडून सदाभाऊ खोत आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मित्रपक्षांच्या नाराजीनंतर सहावा उमेदवार म्हणून खोत यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे.

Vidhan Parishad Election 2022: सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी, समजुतीचा प्रयत्न की बळीचा बकरा?
सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी, समजुतीचा प्रयत्न की बळीचा बकरा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने (bjp) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्याच नेत्यांना उमेदवारी दिल्याने मित्रपक्षांनी भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून जाहीर नाराजीही व्यक्त केली. तर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. मित्र पक्षांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने सदाभाऊ खोत यांना सहावा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मित्र पक्षांना उमेदवारी दिली हे दाखवण्यासाठी भाजपने खोत यांना उमेदवारी दिली की खोत यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा बळीचा बकरा केला अशी चर्चा आता रंगली आहे.

भाजपकडून सदाभाऊ खोत आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मित्रपक्षांच्या नाराजीनंतर सहावा उमेदवार म्हणून खोत यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. विनायक मेटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच भाजपने मागच्यावेळी मंत्रिपदातून आम्हाला डावललं होतं. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला नाही. मित्र म्हणून सोबत घ्यायचं. मग त्यांना दूर करायचं ही प्रतिमा भाजपबद्दल बनत चालली आहे. ते योग्य नाही, असं सूचक विधानही मेटे यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

खोत बळीचा बकरा?

विधान परिषदेच्या एकूण दहा जागा आहेत. त्यापैकी आता मैदानात 12 उमेदवार उभे आहेत. भाजपने 6, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे हा आकडा 12 झाला आहे. म्हणजे दोन अतिरिक्त उमेदवार मैदानात आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येक उमदेवारा 27 मतांची गरज आहे. भाजप आणि अपक्ष मिळून भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजरित्या निवडून येऊ शकतो. पण काँग्रेसनं 10 व्या जागेसाठी उमेदवार दिलाय. त्यामुळे या 10 व्या जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळू शकतं. म्हणजे 10 वा उमदेवार निवडून येण्याची मारामार असतानाच दोन अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत हे बळीचा बकरा ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसला फटका बसणार?

दरम्यान, मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. पहिल्या उमेदवाराला 27 मते दिल्यानंतर काँग्रेसकडे फक्त 17 मते उरतात. त्यामुळे काँग्रेसला दहा मतांची गरज भासणार आहे. समाजवादी पार्टी आणि अपक्षांची मते घेऊन काँग्रेस ही उणीव भरून काढणार की काँग्रेसला राजकीय फटका बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानपरिषद निवडणूक 2022 (उमेदवार)

भाजप

1) प्रवीण दरेकर
2) राम शिंदे
3) श्रीकांत भारतीय
4) उमा खापरे
5) प्रसाद लाड

शिवसेना

1) सचिन अहिर
2) आमशा पाडवी

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे
2) भाई जगताप

राष्ट्रवादी

1) रामराजे नाईक निंबाळकर
2) एकनाथ खडसे