Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं दक्षिण भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

Sam Pitroda : इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी यावेळी भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं आहे. सॅम यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांची रंग, रुप यावरुन वेगवेगळ्या देशांशी तुलना केली आहे.

Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं दक्षिण भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
sam pitroda
| Updated on: May 08, 2024 | 1:48 PM

लोकसभा निवडणुकी दरम्यान इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सॅम पित्रोदा आपल्या वक्तव्यात भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल बोलले. पण याच विविधतेची त्यांनी दुसऱ्या देशांसोबत तुलना केली. ते म्हणाले की, “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात.

दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात. हीच विविधता भारताची ओळख आहे. प्रत्येकाला यावर विश्वास आहे”
“हे अंतर असलं, तरी त्याने काही फरक पडत नाही. इथे आम्ही भाऊ-बहिण आहोत. आम्ही सगळ्यांच्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करतो. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. भारतीय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेतात. हा चॉईस आणि कल्चरचा भाग आहे. गुजराती असलो, तरी मला डोसा, इडली आवडते” असं सॅम पित्रोदा स्टेटमॅनशी बोलताना म्हणाले.

‘मी तामिळनाडूला जातो, तेव्हा…’

“भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांचा पोषाख वेगळा आहे. त्यांची राहण्याची पद्धत वेगळी आहे. हाच भारत आहे. हीच भारताची जगात ओळख आहे. इथे प्रत्येकासाठी जागा आहे. प्रत्येकजण तडजोड करतो. मी तामिळनाडूला जातो, तेव्हा स्थानिक भाषेशी माझा सामना होतो. पण आम्हाला काही अडचण येत नाही. आम्ही हॉटेल, बाजारात आरामात आमच काम करतो” असं सॅम पित्रोदा म्हणाले.

वारसा टॅक्सच्या वक्तव्यावरुन वाद

सॅम पित्रोदा यांच्या वारसा टॅक्सच्या वक्तव्यावरुन सुद्धा वाद झाला होता. अमेरिकेत वारसा टॅक्स आकारला जातो असं ते म्हणाले होते. त्यानंतर भारतात राजकीय पक्षांनी खासकरुन भाजपाने त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. भाजपाने सॅम यांच्या वक्तव्याच्या आधारावर काँग्रेस पार्टीवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या जाहीरनाम्याला संपत्ती सर्वेशी जोडून राहुल गांधीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर सॅम पित्रोदा यांना सांगाव लागलं की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. जो अर्थ काढला, ते बोललो नाही असं ते म्हणाले.

Follow Us