Devendra Fadanvis : जे दिलंय ते उत्तम.. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या अटकळांना मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्णविराम दिला. "जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं," असे म्हणत त्यांनी सध्याच्या पदावर समाधान व्यक्त केले. पत्नी अमृता फडणवीस यांनीही महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होणार, खातेबदल होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लवकरच राजधानी दिल्लीत जाणार,अशाही चर्चांना गेल्या काही काळापासून उधाण आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच चर्चा रंगल्या आहेत. या मुद्यावरून नुकतंच, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असं त्यांनी म्हटलं. तर दिल्लीला जाण्याच्याचर्चंवरून खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता मौन सोडलं आहे. ‘जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्यात आली. त्यानंतर टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी हे या पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती ठरले आणि तुम्हीही मुख्यमंत्रीपदावर बराच काळ राहिले आहात. यावर प्रतिक्रिया देतना मुख्यमंत्री म्हणाले, “निश्चित पांडुरंगाचा आशिर्वाद आहे. पण मी या पदावर सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. मला असं वाटतं की पदावर आपण किती काळ राहिलो, हे महत्वाचं नाही. आपण नेमकं त्या काळाचा नेमका उपयोग काय केला हे महत्वाचे आहे. मला विश्नास आहे कि पांडुरंगाच्या कृपेने अनेक चांगली काम माझ्या हातुन होतील” असं मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं.
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर थेट दिलं उत्तर
पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर… दिल्लीत जाण्याच्या चर्चांवरही मुख्यमंत्री मनमोकळेपणाने बोलले. ” जे दिलं आहे ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं असं आपण म्हणतो ना. तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी.. तसा समाधानी आहे मी “अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
