Sandeep Kshirsagar : ‘वाल्मिक कराड एवढा मोठाही नाही, त्याला…’, संदीप क्षीरसागर काय बोलले?
Sandeep Kshirsagar : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कठोडी सुनावण्यात आली आहे. हा विषय लावून धरणारे बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा काही मागण्या केल्या आहेत.

बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय लावून धरला आहे. वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा त्यांचा आरोप असून चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या हत्या प्रकरणातील अन्य आरोपींसह वाल्मिक कराड फिरत असल्याच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यावर संदीप क्षीरसागर बोलले.
“मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, वाल्मिक कराडच मास्टरमाइंड आहे. खंडणीच्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा झालाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय, लिंक आहे हे. वाल्मिक कराड एवढा मोठाही नाही. मंत्रिपदामुळे संरक्षण मिळतय. त्यांनीच म्हटलय माझे निकटवर्तीय आहेत. या सर्व प्रकरणात धस अण्णा बोललते, ती वस्तुस्थिती आहे” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
पोलिसांना सहआरोपी बनवाव का?
या प्रकरणात पोलिसांना सहआरोपी बनवाव का? अशी तुमची मागणी आहे का? यावर संदीप क्षीरसागर म्हणाले की, “प्रशासन मंत्र्यांच्या दबावाखाली असतं. SP बदलले. वरुन निर्णय झाला. सरकार म्हणून त्यांनी Action घेतली. त्यांनी राजीनामा दिला, तर प्रशासन मोकळ्या श्वासाने काम करेल. पोलिसांनी ठरवलं, तर मूळ कारण समोर येईल”
कृष्णा आंधळे फरार घोषित
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा मागच्या महिनाभरापासून सापडत नाहीय. त्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे.