नारायण राणे राज्यपाल होणार? संजय राऊत यांची अत्यंत थेट, बोलकी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि नारायण राणे यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्यातच नारायण राणे हे राज्यपाल होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

नारायण राणे राज्यपाल होणार? संजय राऊत यांची अत्यंत थेट, बोलकी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 07, 2023 | 10:19 AM

नवी दिल्लीः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) लवकरच पदमुक्त होणार आहेत. तशा राजकीय हालचाली सुरु आहेत. आता त्यांच्या जागी महाराष्ट्राला कोणते नवे राज्यपाल (Maharashtra Governor) मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) राज्यपाल होण्याची शक्यता आहे. अर्थात नारायण राणे महाराष्ट्रात नव्हे तर दुसऱ्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. पण राणेंच्या राज्यपाल पदावरून संजय राऊत यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक, त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत असतात, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय..

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि नारायण राणे यांचे संबंध ताणले गेले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून नारायण राणे यांनी नेहमीच सेनेवर निशाणा साधला आहे. मात्र संजय राऊत यांनी यावेळी प्रथमच राणे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संजय राऊत यांना मीच खासदार बनवलं, मीच पैसे खर्च केले असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरून राऊत यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एक तर खोटं बोलल्याबद्दल जनतेची माफी मागा नाही तर कोर्टात हे वक्तव्य सिद्ध करा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. त्यामुळे नारायण राणे राज्यपाल होणार, या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुख्यमंत्री पदाची कवच कुंडलं, मोदी सेना वरळीत’

आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आव्हान राज्य सरकारने किती गंभीरपणे घेतलंय, हे आजच्या कार्यक्रमावरून दिसून येईल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वरळीत एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानुसार त्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावं, असं डिवचणारं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

वरळीत स्वागत…

संजय राऊत म्हणाले, ‘ या निमित्ताने त्यांचे पाय वरळीला लागतायत, याचा आनंद आहे. परत सांगतो, राजीनामा देऊन येण्याची वाट पाहतो. ३२ वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं, हे वरळीत महाराष्ट्र पाहिल…

आम्ही मोदींची माणसं आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात वरळीत मोदी सेना येणार आहे.’

Follow Us