Sanjay Raut : जेल की बेल?, संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी

| Updated on: Aug 04, 2022 | 7:46 AM

Sanjay Raut : यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी भुजबळांना 2 वर्ष एक महिना आणि 21 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर भुजबळांना जामीन मिळाला होता. नंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली.

Sanjay Raut : जेल की बेल?, संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे. राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी राऊत यांची तब्बल 16 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना आधी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेजेत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीकडून राऊत यांच्या सात दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. राऊत यांच्या वकिलाने त्याला विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली होती.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल 9 तास झाडाझडती घेतली होती. राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यात ही धाड मारण्यात आली होती. त्याचवेळी राऊत यांच्या दादरमधील गार्डन कोर्ट फ्लॅटवरही छापा मारण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापा मारण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तिथेही राऊत यांची चौकशी करून रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांची अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. राऊत यांची कोठडी आज संपत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

जामीन मिळणार का?

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लवकर जामीन मिळणार नसल्याने राऊतांना जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी भुजबळांना 2 वर्ष एक महिना आणि 21 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर भुजबळांना जामीन मिळाला होता. नंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली. देशमुख गेल्या 8 महिने 28 दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. तीच अवस्था माजी मंत्री नवाब मलिक यांची आहे. मलिक हे सुद्धा 4 महिने 27 दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांनाही जामीन मिळाला नाही. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.