Shiv Sena symbol | शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला आहे.

Shiv Sena symbol | शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Google
| Updated on: Feb 17, 2023 | 7:39 PM

मुंबई : शिवसेना नाव ( shivsena Party ) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला हा मोठा धक्का आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे. त्यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया ही ठाकरे गटाचे नेते तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यावेळी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय पुढील काळात न्यायालयात या निर्णयावर आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय राऊत म्हणाले,  हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे.

या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात खरंतर राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना अचानक हा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता.

आमदार गेले म्हणून पक्ष जात नाही असा दावा अनेकदा उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगापुढे मांडला होता. याशिवाय शपथपत्र देखील दोन्ही गटाकडून देण्यात आले होते. दोन्ही गटाने नाव आणि पक्ष यावर हक्क सांगितल्याने निर्णय कुणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून होते.

Follow Us