
पुणे : शिंदेगटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन (Shahaji Bapu Patil Weight Loss) घटवलं आहे. अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटलंय. एवढ्या कमी दिवसात त्यांनी हे कसं साधलं. त्यांचा फिटनेस मंत्रा नेमका काय आहे? याविषयी शहाजीबापूंनी (Shahaji Bapu Patil) स्वत:च टीव्ही 9 मराठीशी बोलताना माहिती दिली आहे.
माझा गुडघा दुखत होता. त्यामुळे डॉक्टरांनी गेल्यावर त्यांनी मला दोन पर्याय दिले एकतर ऑपरेशन करणं किंवा वजन कमी करणं. ऑपरेशन करण्यापेक्षा मी वजन कमी करण्याचा पर्याय निवडला.
वजन कमी करण्यासाठी बंगळुरूला गेलो. तिथं श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचा 10 दिवसांचा कोर्स केला. सुरुवाती पाच ते सहा दिवस त्यांनी पंचकर्म केलं. तेव्हा वेगवेगळे काढे प्यायला दिले. वेगवेगळ्या तेल आणि पावडरने मालिश केली. या सगळ्याने माझं चार किलो वजन कमी झालं.
मग मेडिटेशन सुरु केलं. मेडिटेशनच्या माध्यमातून सुदर्शन क्रिया केली. त्यांचा वाफेवर उकडलेला आहार घेतला. व्यायाम केला. या सगळ्याचा परिणाम होऊन वजन कमी झालं.
पंचकर्म, योगासने आणि डायटच्या माध्यमातून 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं. खूप चांगला अनुभव मिळाला आहे, जीवन खूप सुंदर आहे. त्यासाठी फिट राहाणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
मागे एकदा बोलताना शहाजीबापूंनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलं होतं.गावाकडं या बोकडाचं मटण कसं वरपायचं तो सांगतो, असं म्हटलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता आता ताकद वाढली आहे. ती जास्त झाली आहे. ती कमी करायची वेळी आली आहे, असं शहाजीबापू म्हणालेत.
शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. ‘काय झाडी, काय डोंगर’या डायलॉगने तर शहाजीबापूंना विशेष ओळख दिली. आता शहाजीबापू वजन घटल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वत:मध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.
सगळेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. वजन घटवणं हे अनेकांसमोरचं चॅलेंज आहे. त्यांच्यांसाठी शहाजीबापू एक उदाहरण म्हणून समोर आहेत.