Shahajibapu Patil : ज्यांचं आयुष्य खोकी घेण्यात गेलं, त्यांचीच खोक्यांवर बडबड; शहाजीबापू पाटलांचा नेमका निशाणा कुणावर?

Shahajibapu Patil : काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर काँग्रेसचे आमदार फुटणार की नाही हे मला माहीत नाही. पण काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी निश्चित आहे, असं सांगून पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

Shahajibapu Patil : ज्यांचं आयुष्य खोकी घेण्यात गेलं, त्यांचीच खोक्यांवर बडबड; शहाजीबापू पाटलांचा नेमका निशाणा कुणावर?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2022 | 1:47 PM

सोलापूर : भाजपकडून (bjp) खोकी घेतल्यामुळेच शिंदे गटाने बंड केल्याचा आरोप शिवसेनेकडून (shivsena) वारंवार केला जात आहे. आजही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून हा आरोप केला आहे. शिंदे गटाकडूनही खोक्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अचानक पडलेल्या दणक्यामुळे अजून त्यांची नशा उतरलेली नाही. त्यामुळे समोरच्याला खोकी संघटना दिसत आहे. ज्यांची प्रवृत्ती खोक्यांचीच आहे. तेच खोक्यावर बोलतात. ज्यांचं आयुष्य खोक्यात गेलं. त्यांनाच खोकी दिसणार. ज्यांची खोकी संस्कृती तेच टीका करतात. सामनातून लिहितात, हे चुकीचं आहे, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. तसेच काँग्रेसचे आमदार अस्वस्थ आहेत, असं सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे.

काही लोक आज पातळी सोडून राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे खोक्यांवरून वारंवार टीका करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. तानाजी सावंत हे निष्क्रिय नाही तर कार्यक्षम मंत्री आहेत, असं सांगतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर काहीही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. येत्या 12 सप्टेंबरपासून मतदारसंघात दौरा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसमध्ये नाराजी

काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर काँग्रेसचे आमदार फुटणार की नाही हे मला माहीत नाही. पण काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी निश्चित आहे, असं सांगून पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार फुटणार की नाही, याबाबतची साशंकता निर्माण झाली आहे.

गर्दी नसल्याने टीका करणं चुकीचं

राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे आमदारांना दोन माणसांपासून 10 हजार माणसांपर्यंत कुणासोबतही बसावं लागतं. त्याच्यासाठी संख्या महत्त्वाची नसते. त्यामुळे सभेला गर्दी नाही म्हणून भुमरे यांच्यावर टीका करणे चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही गट आमने सामने

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केलं. त्यासाठी त्यांना खोकी मिळाली. प्रत्येकाला 50 खोकी मिळाल्याने त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याची टीका शिवसेनेकडून केली जात आहे. आदित्य ठाकरे तर या आमदारांचं गद्दार असाच उल्लेख करत असतात. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संतापलेले असून त्यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.