सरकारचे मंत्री ‘गोली मारो’सारखी विधान करतात : शरद पवार

| Updated on: Mar 01, 2020 | 10:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ता शिबिरमध्ये दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (NCP Sharad Pawar).

सरकारचे मंत्री गोली मारोसारखी विधान करतात : शरद पवार
Follow us on

मुंबई : “सरकारचे मंत्री गोली मारो सारखे वक्तव्य करतात. हे निंदनीय आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविवारी (1 मार्च) मुंबईत कार्यकर्ता शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सूचना देण्यात आल्या. शरद पवार यांनी यावेळी दिल्लीतील हिंसाचारावरही भाष्य केलं (NCP Sharad Pawar).

“देशाच्या राजधानीला आग लागली. दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आणि विचारांचे शहर आहे. ज्यावेळी सत्ता आणि लोकांचा पाठिंबा मिळत नाही, त्यावेळी सांप्रदायिक विचारांचा आधार घेत समाजात फूट पाडायची आणि जातीय दंगली घडवून आणायची”, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

“एकीकडे आपण जगातील महासत्ता म्हणून गौरविल्या जाणाऱ्या देशाच्या अध्यक्षांचे स्वागत करतो. तर दुसरीकडे देशातील एका वर्गावर हल्ले होतात, हे योग्य नाही. दिल्ली हिंसाचारासारखी निंदनीय घटना याआधी कधी घडली नाही. तर दुसरीकडे सरकारचे मंत्री गोली मारोसारखी वक्तव्य करतात. हे निंदनीय आहे”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले (NCP Sharad Pawar).

“देशात सध्या जी परिस्थिती आहे त्यावर राष्ट्रवादीची काय नीती आहे? हे आपण कार्यकर्ते म्हणून समजून घेतलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपण पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमांच्या आधारावर सत्ता प्रस्थापित केली. पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन शिबीर महत्वाचं. राजकीय पक्षात चढ-उतार येत असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी संघर्षाचा काळ होता”, असं शरद पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

‘दिल्लीत शांतता राखण्यात केंद्र सरकार फेल’

“आज महाराष्ट्रात तीन पक्षाचं राज्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे. इथे शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, दिल्लीत तसं नाही. दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि यात केंद्र सरकार पूर्णपणे फेल ठरलं आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

“लोकसभेत जिथे भाजपला जास्त जागा मिळाल्या त्या राज्यांमध्ये आज भाजपचं सरकार राहिलेलं नाही. कारण आपण जो निर्णय घेतला तो देशाच्या हिताचा नव्हता हे लोकांना आता कळून चुकलं आहे”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

“विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढली. पण भाजपने पहिल्या दिवसापासून शिवसेनेला कमीपण दिलं. शिवसेनेनं ते ओळखलं आणि योग्य निर्णय घेतला. इंदिरा गांधींच्यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि उमेदवार दिला नव्हता”, असं शरद पवार म्हणाले.

“हे सरकार पाच वर्ष टिकेल यात मला संशय नाही. मुंबईत अधिक काम करण्याची आणि संघटनेची वाढ करण्याची गरज आहे. नवीन लोकांना संधी दिली जात नाही. त्यामुळे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. भाकरी फिरवली नाही तर भाकरी करपते. आपला विस्तार वाढवला पाहिजे, आपलं घर वाढवलं पाहिजे”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा : ‘त्यांना’ सगळं दिलं मात्र एकही मायचा लाल थांबला नाही : अजित पवार