भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

| Updated on: Nov 14, 2020 | 11:23 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते. | Sanjay Raut

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत
Follow us on

मुंबई: शिवसेना आणि भाजप राजकारणात 25 वर्षे एकत्र होते. त्यामुळे भाजपसोबत आमचा भावनिक बंध तयार झाला होता. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला भाजपशी नाते तोडावे लागले. हे नाते केवळ राजकीय नसून भावनिक होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते, अशी भावना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलून दाखवली. (sanjay raut in shut up ya kunal interview)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि राष्ट्रीय राजकारण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या कटुतेविषयीही त्यांनी भाष्य केले.

आम्हाला भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यासाठी काही कारणे आहेत. ही युती फक्त राजकीय नव्हे तर भावनिक होती. त्यामुळे ही युती तुटल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपविषयीचा रोषही भावनिक होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना कार्यकर्त्यांकडून “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” अशा घोषणा देऊन खिल्ली उडवण्यात आली होती.

कोणत्याही नेत्याचा अपमान होता कामा नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, त्यावेळी शिवसैनिकांच्या भावना आणि वातावरण वेगळेच होते, असे संजय राऊत यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. उद्धव ठाकरे खरंच मुख्यमंत्री झाले आहेत का, हे लोकांना खरे वाटत नव्हते. आपण स्वप्नात तर नाही आहोत ना हे तपासण्यासाठी लोक स्वत:लाच चिमटा काढून बघत होते, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(sanjay raut in shut up ya kunal interview)