VIDEO: G-23 म्हणजे काँग्रेसचे सडके कांदे, संजय राऊत आता राहुल गांधींची भाषा बोलतायत?

पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जी-23 नेत्यांनी डोकं वर काढलं असून या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तर थेट गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडण्याची मागणी केली आहे.

VIDEO: G-23 म्हणजे काँग्रेसचे सडके कांदे, संजय राऊत आता राहुल गांधींची भाषा बोलतायत?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 11:27 AM

नवी दिल्ली: पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जी-23 नेत्यांनी डोकं वर काढलं असून या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी तर थेट गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडण्याची मागणी केली आहे. घर की काँग्रेस ऐवजी सब की काँग्रेस झाली पाहिजे, असं मत सिब्बल यांनी मांडलं आहे. काँग्रेसच्या या जी-23 नेत्यांवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार टीका केली आहे. जी-23 नेते म्हणजे काँग्रेसचे सडके कांदे आहेत. ते कुणाची तरी सुपारी घेऊन काँग्रेसविरोधात काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची मैत्री पाहता राऊत हे राहुल गांधींची भाषा बोलत आहेत का? अशी जोरदार चर्चाही रंगली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना काँग्रेसच्या जी-23 नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. जी-23 आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही असं मला वाटतं. जी-23 कुणाची तरी सुपारी घेऊन काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे असं मला वाटतं. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षाचं स्थान राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत राहिला पाहिजे. जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येण्याची गोष्ट करतो तेव्हा त्यात काँग्रेस असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधीच्या बाजूने भक्कम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आघाडीच्या कारभाराच्या निमित्ताने संजय राऊत यांच्या राहुल गांधी यांच्यासी वारंवार भेटी होत आहेत. राऊत हे राहुल गांधी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा करतात. मागे एकदा राहुल गांधी यांनी राऊतांकडून शिवसेनेचा उदय, वाटचाल आणि कार्यपद्धतीविषयी जाणून घेतलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेतलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील जवळीक अधिकच वाढली. आघाडीच्या बैठकांमध्येही राहुल गांधी आणि राऊत एकमेकांच्या शेजारी बसताना दिसतात. या जवळकीमुळेच राऊत हे राहुल गांधी यांची सातत्याने बाजू घेताना दिसतात. मीडियाशी जाहीरपणे बोलतानाही आणि दैनिक सामानातील अग्रलेखाच्या माध्यमातूनही ते राहुल गांधींची बाजू घेताना दिसत असतात.

सिनेमा टॅक्स फ्रि केल्याने वेदना संपत नाही

काश्मीर फाईल हा सिनेमा टॅक्स फ्रि केला जात नसल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यावरूनही त्यांनी विरोधकांना झापले. टीका करण्याला काही अर्थ नाही. हा काही राजकीय अजेंडा नाही. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांसाठी आम्ही करून दाखवलं. भाजप शासित कोणत्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलासाठी काय केलं? केवळ सिनेमा टॅक्स फ्रि केल्याने त्यांच वेदना संपवता येणार नाही. 32 वर्षानंतर तुम्हाला आठवतंय? कारण पुढे चार राज्यांच्या निवडणुका आहेत. हे राजकारण आहे. आम्ही त्या पिढीला 32 वर्षापूर्वी दिलं आहे. उगाच इतिहास तोडूनमोडून लोकांसमोर आणू नका. काश्मीरची लढाई ही देशाची लढाई होती. काश्मीरमध्ये शिखांचीही हत्या झाली. राष्ट्रभक्त मुस्लिमांचीही हत्या झाली आहे. त्यावेळी फक्त बाळासाहेबांनी आवाज उठवला. बाकी सगळे अळीमिळी गुपचिळी गप्प होते. त्यांना अतिरेक्यांची भीती वाटत होती, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

VIDEO: पंतप्रधान ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारक, सिनेमाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवला जातोय, संजय राऊतांची खोचक टीका

Maharashtra News Live Update : राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रडताय का ? – संजय राऊत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us