महाराष्ट्राने नवी दिशा दिली, राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हावं; संजय राऊतांकडून ममतादीदींचं समर्थन

| Updated on: Apr 02, 2021 | 11:05 AM

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून भाजपच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. (shiv sena leader sanjay raut on mamata banerjee's letter)

महाराष्ट्राने नवी दिशा दिली, राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हावं; संजय राऊतांकडून ममतादीदींचं समर्थन
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us on


ठाणे:
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून भाजपच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममतादीदींच्या या आवाहनाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दाखवली आहे. नवा मार्ग दाखवला आहे. राष्ट्रीय स्तरावरही तेच झालं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (shiv sena leader sanjay raut on mamata banerjee’s letter)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधकांना एक पत्र लिहिलं आहे. एकूण 27 नेत्यांना त्यांनी पत्रं लिहिलं आहे. देशात नक्की काय होत आहे? असा सवाल करतानाच सर्वांनी एकत्र यावर असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्या पत्रावर सर्वांनी विचार केला पाहिजे. एकत्र येणं गरजेचं झालं आहे. सर्वांनी आता एकत्रं आलं पाहिजे. या संदर्भात सर्वांनी एकत्र बसायला हवं. चर्चा करायला हवी. मला वाटतं सर्व एकत्र येतील, असं राऊत म्हणाले.

आज कोणीही जयप्रकाश नारायण नाही

1975मध्ये आणीबाणीच्या वेळेस जनता पक्ष एकत्र आला होता. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. तेव्हा सुद्धा त्यांना आणण्याचे काम जयप्रकाश नारायण यांच्याकडून करण्यात आले होते. आज कोणीही जयप्रकाश नारायण नाहीत, हे दुर्देव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आघाडी सरकार आदर्श सरकार

महाराष्ट्र विकास आघाडी हा एक प्रयोग देशाच्या राजकारणात झाला आहे. हे संपूर्ण भाजपने शिकावे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचाराचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सरकार चालवत आहे. हे आदर्श सरकार आहे असं मी मानतो. अशा प्रकारची आघाडी यूपीएकडून करण्यात यावी. ममता बॅनर्जी यांनी जवळ जवळ तशाच प्रकारच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राने नवी दिशा दाखवली आहे. ते राष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे, असं ते म्हणाले.

ठाकरे-पवार बोलणं सुरू

लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत मी काहीच बोलू शकत नाही. त्याचा निर्णय सरकार घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत बोलणं सुरू आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. मुंबईही रोजीरोटी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील प्रजा देशाची नागरिक

बंगालच्या निवडणुका होतीलच. पण कोरोना वाढतोय. महाराष्ट्राकडे लक्ष देत इतर राज्यातील कोरोना प्रादुर्भावाकडेही लक्ष दिलं पाहिजे. त्या त्या ठिकाणच्या समस्या दूर केल्या पाहिजे. भलेही महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसेल, पण केंद्राने तरीही महाराष्ट्रावर लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील प्रजा देशाची नागरिक आहे, हे केंद्राने विसरता कामा नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. (shiv sena leader sanjay raut on mamata banerjee’s letter)

 

संबंधित बातम्या:

गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली; पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?: नाना पटोले

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांचा महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

(shiv sena leader sanjay raut on mamata banerjee’s letter)