महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा

| Updated on: Nov 01, 2020 | 12:06 PM

दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. | Deepak Kesarkar

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा
Follow us on

सिंधुदुर्ग: महाविकासघाडीतील अंतर्गत कुरबुरींमुळे अगोदरच हैराण असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता नवी अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेच्या वर्षभरानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे राज्य सरकारवर नाराज असल्याचं म्हटलं जातं. यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये केसरकर गृह राज्यमंत्री होते. मात्र, महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. (Shivsena leader Deepak Kesarkar express his dissatisfaction)

दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, शनिवारी त्यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली. “मला स्वत:चे नाही पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख वाटते. यापूर्वी मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही, असे केसरकर यांनी बोलून दाखवले. दीपक केसरकर यांची ही नाराजी शिवसेनेतील आगामी अंतर्गत वादाची नांदी ठरण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर जाधव मंत्रिपद न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर रुसले होते. याच नाराजीमुळे भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील शपथविधीवेळीही अनुपस्थित राहिले होते. यानंतर भास्कर जाधव यांना मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यामुळे आता दीपक केसरकर यांच्याबाबतीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप; आघाडीत खळबळ
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे चव्हाण यांनी म्हटले होते. यामुळे महाविकासआघाडीतील खदखदही समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या:

अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा डाव; दरेकरांचा दावा

अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची सारवासारव

मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

(Shivsena leader Deepak Kesarkar express his dissatisfaction)