भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा वेळ!

| Updated on: Oct 04, 2021 | 7:04 PM

भावना गवळी यांना आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, गवळी यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी आपल्याला 15 दिवसांचा वेळ देण्यात यावा अशी मागणी गवळी यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा वेळ!
भावना गवळी, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, भावना गवळी आज ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नाहीत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गवळींवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास भावना गवळी यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. तशी मागणी त्यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केलीय. (Shivsena MP Bhavana Gawli absent from ED inquiry)

भावना गवळी यांना आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, गवळी यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी आपल्याला 15 दिवसांचा वेळ देण्यात यावा अशी मागणी गवळी यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. समन्स वेळेवर न मिळाल्याचं कारण सांगत त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. 15 दिवसांनी चौकशीला हजर राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.

किरीट सोमय्यांची टीका

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी मुंबईतील ईडी कार्यालयात 100 कोटीच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. त्याऐवजी त्या अडसूळ हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. अनिल देशमुख गायब होतात. ठाकरे सरकारचे मंत्री आणि नेते घोटाळा केल्यानंतर चौकशीला का सामोरे जात नाहीत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय.

भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

भावना गवळी यांचा राजकीय प्रवास

लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप आमदार नमिता मुंदडांचं एक दिवस अन्नत्याग आंदोलन

‘..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

Shivsena MP Bhavana Gawli absent from ED inquiry