‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

| Updated on: Sep 18, 2021 | 4:01 PM

शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरु असताना अशा वक्तव्याची गरज काय? असा पवार म्हणाल्याचंही कळतंय. अशावेळी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे.

पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज, मुनगंटीवारांचा जोरदार टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us on

चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी औरंगाबादेत आयोजित एका कार्यक्रमात भाजपसोबत्या युतीबाबत एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरु असताना अशा वक्तव्याची गरज काय? असा पवार म्हणाल्याचंही कळतंय. अशावेळी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. (Sudhir Mungantiwar criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray)

‘शरद पवार यांना उध्दव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज आहे, अशी खोचक प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे. तुम्हाला तर जनतेने निवडणुकीत नापास केलं होतं. तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरचं नाव खोडून स्वतःचं नाव टाकलं आणि सत्ता आली म्हणून सांगत आहात, अशी तिखट टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जनता तुमच्यावरची नाराजी व्यक्त करेल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना लगावलाय.

‘शिवसेनेची बेईमानी अधिक काळ चालणार नाही’

युती भाजपने तोडली हे 21व्या शतकातील आठवे आश्चर्य असल्याचं खोचक वक्तव्यही त्यांनी केलंय. निकाल लागताच भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका घेतली. त्यातून शिवसेनेने आपला खरा चेहरा दाखवला. शिवसेनेनं बेईमानी केली असून ती अधिक काळ चालणार नाही. पुढील निवडणुकीत जनता त्यांची लक्तरं वेशीवर टांगेल, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केलाय.

‘राऊतांचं वक्तव्य म्हणजे राजकारणातील पीजे’

‘खूप लोकांना इकडे यायचे आहे’, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ गंमत सुरू असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. सध्या या राजकीय गमती जमतीचा स्तरही अत्यंत खालावला आहे. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार फुटणार असल्याचं वक्तव्य केलं होते. मात्र, आव्हान देऊन देखील हे शक्य झाले नाही. शिवसेनेचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणातील पीजे असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

खुद्द शरद पवार यांची नाराजी?

महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय? असा सवाल पवार यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

Sudhir Mungantiwar criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray