सुनेत्रा वहिनी बारामतीतून लढणार?, सुप्रिया सुळे यांचं अजितदादा यांना थेट आव्हान; म्हणाल्या, माझ्यासमोर…

मनोज जरांगे यांची तब्येत खालावत आहे. त्यांना जर उद्या काही झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल. हे सगळं दुर्देवी आहे. सरकार फक्त फसवणूक करत आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांनी बारामतीकरांना अर्पण केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

सुनेत्रा वहिनी बारामतीतून लढणार?, सुप्रिया सुळे यांचं अजितदादा यांना थेट आव्हान; म्हणाल्या, माझ्यासमोर...
pawar family
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 17, 2024 | 7:05 PM

संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : अजितदादा गटाने खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून उभे राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढताना दिसणार आहे. तसेच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती पहिल्यांदाच आमनेसामने उभ्या ठाकलेल्या दिसणार आहेत. या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना बारामतीच्या निवडणुकीवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर त्यांनी माझ्यासारखा तगडा उमेदवार जरूर आणावा. मी सुद्धा चर्चेसाठी तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी आणि ते म्हणतील त्या वेळी मी त्यांच्या उमेदवारासोबत चर्चा करायला तयार आहे, असं आव्हानच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

लोकशाहीवर टीका हे दुर्देव

सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार दिल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा काय म्हणाले ते मी काही ऐकलं नाही. पण जे काही कानावर येत आहेत, ती विधाने धक्कादायक आहेत. शरद पवार लढवय्ये आहेत. त्यांनी शून्यातून सर्वकाही निर्माण केलं आहे. हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालला आहे. देशात लोकशाही आणि संविधान सर्वात मोठे आहे. पंतप्रधान जेव्हा निवडून आले तेव्हा ते पायऱ्यांवर पाया पडले. आमच्या सगळ्यांसाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर संसद भवन आहे. देशाची सेवा करण्यासाठी आम्ही संसद भवनात येतो. लोकशाहीवर टीका हे दुर्दैवी. त्यांचं विधान मला बाळबोध वाटतं. हा संविधानाचा अपमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फडणवीस यांनाच विचारा

धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारा. बारामतीत येऊन आमच्या घरासमोरच फडणीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं होतं. धनगर समाजाप्रमाणेच मुस्लिम, लिंगायत आणि व्हिजेएनटी समाजालाही फसवण्याचं काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

सरकारमध्ये सावळागोंधळ

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यावरूनही त्यांनी सरकारला इशारा दिला. जरांगे पाटलांना काही झालं तर ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असेल. हे लोक कॅबिनेटमध्ये एक बोलतात आणि कॅबिनेटबाहेर वेगळं बोलत असतात. महाराष्ट्र सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us