पावसाची प्रतीक्षा संपली! बळीराजा दुमदुमला; लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
Maharashtra Weather Updates: मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. ज्यामुळे शेतकरी सुखावला आहे.. लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Maharashtra Weather Updates: मराठवाड्यात दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पाऊस बरसला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. समोर आलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा पाऊस झाला आहे. मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. पाऊस नसल्याने वातावरणात कमालीची उष्णता वाढली होती, पण आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, या पावसामुळे वातावरण सामान्य व्हायला मदत होत आहे. पण वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातल्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
तर परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मध्यरात्री पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे बळीराजा दुमदुमला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील वाळून जात असलेल्या भाजीपाला आणि खरीपाच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र शेकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
हिंगोलीमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे. जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठं हाल झालेले, त्यानंतर अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. मूग ,उडीद ,सोयाबीन सोडून इतर खरीपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात अजूनही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
