Shreyas Iyer: भारतीय पोरांनी मैदान गाजवलं पण श्रेयसला कौतुक अफगाण मुलांचे, नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer On Afganistan Team: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे कौतुक नाही केले पण अफगाणिस्तानचे कौतुक केले. त्याने असं का केले ते पाहा...

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानचा १२७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या मोठ्या विजयासह, भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला आणि ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने संघाची कामगिरी, नाणेफेकीची रणनीती आणि आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
श्रेयस काय म्हणाला?
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास सांगितल्यावर, कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की “मी फलंदाजीसाठी आधीच मानसिकदृष्ट्या तयार होतो. खरं सांगायचं तर, मला माहित होतं की आज आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रानशी माझी थोडक्यात चर्चा झाली होती, ज्यालाही पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करायची होती. त्यामुळे, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, हे माझ्या मनात स्पष्ट होते. आमची सुरुवात शानदार झाली आणि मधल्या षटकांमध्ये धावा करून २२० पेक्षा जास्त धावा करणे खरोखरच कौतुकास्पद होते.”
श्रेयस अय्यरने सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याने ३० चेंडूंमध्ये विक्रमी शतक झळकावले, आणि त्यानंतर किफायतशीर व भेदक गोलंदाजी करणाऱ्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचे कौतुक केले. अभिषेक शर्माबद्दल तो म्हणाला, “या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण अभिषेक ज्या पद्धतीने आज फलंदाजी करत होता ती अगदी निर्भिड होती. मैदानावर त्याला या शैलीत फटके खेळताना पाहणे एक पर्वणी होती.”
अक्षर पटेलबद्दल तो म्हणाला, “अक्षरने हे पूर्वीही केले आहे आणि तो आजही करत आहे. त्याला प्रचंड अनुभव आहे. कठीण परिस्थिती कशी हाताळायची हे त्याला माहीत आहे. तो एक असा खेळाडू आहे जो नेहमी शांत मन ठेवतो आणि आपल्या खेळावर कठोर परिश्रम करतो. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याला क्रेडिट देणं गरजेचे आहे.”
३-० अशा एकतर्फी मालिका विजयाबद्दल आणि विरोधी संघावर टाकलेल्या दबावाबद्दल बोलताना, कर्णधाराने विरोधी संघाबद्दल आदर व्यक्त केला आणि याला एकतर्फी दादागिरी आम्ही केली असं म्हणता येणार नाही, अफगाणिस्ताननेही मालिकेत जोरदार झुंज दिली आणि खेळण्यासाठी भारताचा दौरा करून आल्यामुळे, त्यांच्या झुंजार वृत्ती आणि कामगिरीबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.”
