‘मोगलांपेक्षा वाईट, ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार’, भाजप आध्यात्मिक आघाडीचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र, तुळजापुरातील आंदोलन स्थगित

| Updated on: Nov 06, 2020 | 11:30 AM

राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरु होतं. मात्र तुळजापूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करत हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे.

मोगलांपेक्षा वाईट, ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार, भाजप आध्यात्मिक आघाडीचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र, तुळजापुरातील आंदोलन स्थगित
Follow us on

तुळजापूर: राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे. राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिर परिसरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. पण नगर परिषदेने आंदोलन स्थळावरील तंबू रातोरात उखडून टाकले. तसंच तुषार भोसले यांना तुळजापूर पोलिसांनी नोटीसही बजावली. इतकंच नाही तर तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू केली. त्यामुळे अखेर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय भाजप आध्यात्मिक आघाडीनं घेतला आहे. (The agitation of BJP spiritual front was canceled after the curfew was imposed in Tuljapur)

‘ठाकरे सरकार साधू-संतांशी चर्चा करायला तयार नाही. त्यांना नोटीसा बजावल्या. लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेले अधिकार हे सरकार हिसकावून घेत आहे. हे सरकार मोगलांपेक्षाही वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळं आहे. या काळ्या सरकारचा काळ्या फिती लावून निषेध करतो’, अशा शब्दात तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. आंदोलनं उधळून लावण्यासाठी सरकार पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही भोसले यांनी केला आहे. हिंमत असेल तर निवडणूक लावून दाखवा, तुमचं सरकार पाडू, असं थेट आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

आंदोल स्थगित केलं नाही तर पुढील 15 दिवस तुळजापूरमध्ये कलम 144 लागू करु, अशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली. त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

नगरपरिषदेने रातोरात मंडप उखडून टाकला

भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे. यासंदर्भात तुषार भोसले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असं भोसले यांनी जाहीर केलं होतं. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही ,जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार तुषार भोसले यांनी केली होता. पण, अखेर भोसले यांनी आंदोलन स्थगित करावं लागलं आहे.

“दार उघड उद्धवा, दार उघड!”

‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

तुळजापुरात आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन; नगरपरिषदेने रातोरात मंडपच उखाडला

तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू, भाजप आध्यात्मिक आघाडीचं ठिय्या आंदोलन उधळलं जाणार?

The agitation of BJP spiritual front was canceled after the curfew was imposed in Tuljapur