मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, महापालिकेकडे 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव

| Updated on: Feb 12, 2020 | 7:19 PM

आरे येथील मेट्रो कारशेडमधील झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात आडवी येणारी तब्बल 508 झाडे हटवण्यात येणार (Tree cutting due to metro work) आहेत.

मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, महापालिकेकडे 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव
Follow us on

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेडमधील झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात आडवी येणारी तब्बल 508 झाडे हटवण्यात येणार (Tree cutting due to metro work) आहेत. यामध्ये 162 झाडे मुळापासून कापण्यात येणार आहेत. तर 346 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव शुक्रवारी (14 फेब्रुवारी) पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे वृक्षप्रेमी मुंबईकरांचे लक्ष (Tree cutting due to metro work) लागले आहे.

आरे येथील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांमुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि सामाजिक संस्था आक्रमक झाल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मेट्रो प्रकल्पासाठी 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समिती समोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन 2ए च्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी 32 झाडे कापण्यात येणार असून 90 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय गोरेगाव पश्चिमेकडील मेट्रो 2ए प्रकल्पाच्या गोरेगाव आणि बांगूरनगर स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी 29 झाडे कापणे आणि 85 झाडे पुनर्रोपीत करण्याची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मागण्यात आली आहे.

कांदिवली पश्चिम येथील मेट्रो लाईन 2ए च्या लालजीपाडा ते महावीर नगर दरम्यानच्या कामात अडथळा निर्माण करणारी 53 झाडे कापणे आणि 21 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत. तर दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची 64 झाडे कापणे आणि 37 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्चिम येथील 11 झाडे कापणे आणि 86 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

याबाबतचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा असल्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

आमची भूमिका मेट्रो विरोधी नाही झाडं वाचली पाहिजेत अशी आहे, अशी भूमीका शिवसेनेची आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचा पालिकेतील जुना मित्र पक्ष भाजप यांनी मात्र “विकास हा झाला पाहिजे , मुंबईकरांचा प्रवास मेट्रोमुळे सुखकर होणार असेल तर मेट्रोच्या आड येणारी झाड तोडावीत”. अस भाजपने म्हटलं आहे.