Uddhav Thackeray : बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल; कांगावा सुरु असल्याचाही आरोप

| Updated on: Jun 22, 2022 | 11:02 PM

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक साद घातलीय. तर विरोधकांनी उद्धव ठाकरे कांगावा करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

Uddhav Thackeray : बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल; कांगावा सुरु असल्याचाही आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेना दुभंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे 35 पेक्षा अधिक आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना (Shivsena Rebel MLA) भावनिक साद घातलीय. तर विरोधकांनी उद्धव ठाकरे कांगावा करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

केवढा हा कांगावा – उपाध्ये

‘धर्म आणि राजकारण एकत्र केले ही आमची चूक होती” अशी कबुली विधानसभेतील पहिल्या भाषणात ठाकरेंनी दिली होती.
आज सरकार आणि पक्ष संकटात आल्यावर, हिंदुत्व हा श्वास असल्याची आठवण झाली! केवढा हा कांगावा!’, असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलंय.

पुरे झालं, जनता विटली आहे – भातखळकर

तर आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंवर ट्विटरद्वारे निशाणा साधलाय. ‘बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता…’ असा टोला भातखळकर यांनी लगावयाय. तसंच उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे भूमिका मांडणार असं जाहीर केलं. तेव्हाही भातखळकर यांनी ट्विटरवरुन टीका केली होती.

उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन काय?

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी  मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.