फुटलेले गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे… उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश

Uddhav Thackeray : यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.

फुटलेले गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे... उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश
Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh
Image Credit source: Google
| Updated on: Jun 27, 2026 | 12:49 PM

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जात सभा आणि मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

तिकडे गाढवाचे जीवन जगा…

उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुखांवर टीका करताना म्हटले की, ‘दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. ते म्हणाले मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वताची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं. गेले सासरी, आता नांदा तिकडे, गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा.’

गद्दार जिथे सापडेल तिथे…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ‘आता हा गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा. मी निवडून आणलं, का गद्दारी केली. मला पैसे मिळाले असते तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला जागलो. निष्ठेला जागलो. तू बोल का गद्दारी केली. असं विचारा. पुढचे तीन वर्ष हा कार्यक्रम करावा लागेल असं आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

भाजपवर सडकून टीका

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘निवडणुका नसतानाही फोडाफोडी केल्या जात आहे. हा काळ असा त्यांनी निवडला. लोकसभेला आलो होतो. त्यांची घोषणा होती अब की बार 400 पार. मी म्हणालो होतो, अब की बार तडीपार. त्यांना संविधान बदलायचं आहे. फोडाफोडी करायची आहे. घटनेत बदल केला की पाहिजे ते करता येईल. गुलामगिरी आणि हुकूमशाहीची राजवट रोखण्यासाठी आपण मैदानात आहोत. बाकी राज्य उठतील तेव्हा उठतील. पण महाराष्ट्र जागा राहणार की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हे काम सोपं नाहीये. त्याने गद्दारी का केली. तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आहे. पुढचा खासदार भगव्याचा कट्टर असला पाहिजे. आजपासूनच कामाला लागा.’

Follow Us