शेतकरी-कामगार एकत्र आल्यास देशात काय होणार?; के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या सभेत सांगितलं

| Updated on: Feb 05, 2023 | 5:11 PM

अब की बार किसान सरकार, अशी घोषणाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते? शेतकरी-कामगार यांना एकजूट होण्याचे आवाहन केले.

शेतकरी-कामगार एकत्र आल्यास देशात काय होणार?; के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या सभेत सांगितलं
के. चंद्रशेखर राव
Follow us on

नांदेड : भारतात शेतकऱ्यांची (Farmer) संख्या 42 टक्के पेक्षा जास्त आहे. शेतकरी – कामगार दोन्ही मिळून 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. शेतकरी आणि कामगार एकत्र आल्यास दोघे एक झाले तर 50 टक्के पेक्षा जास्त होतात. हे दोघे एकत्र झाले तर सरकार बनवायला अवघड नाही, असं मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं. मेक इन इंडिया योजनेवर चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी टीका केली. मेक इन इंडिया हा जोक इन इंडिया बनला असल्याची टीकाही के. चंद्रशेखर राव यांनी केली. के. चंद्रशेखर राव म्हणाले, मी जे बोलतोय त्याकडे लक्ष द्या. मी राजकारणाचे बोलत नाही तर आपल्या जीवन मरणाचे बोलत आहे.

ते एकमेकांवर आरोप करतात

54 वर्षे काँग्रेसने सत्ता गाजवली. 16 वर्षे भाजपने सत्ता केली. भारताच्या या परिस्थितीला हे दोन्ही पक्षच जबाबदार आहेत. काँग्रेस गेली अन् भाजप आली. ते एकमेकांवर आरोप करतात. तू किती खाल्ले आणि मी किती खाल्ले? तुझा अदानी तर माझा अंबानी म्हणत बसलेत, असंही के. चंद्रशेखर राव यांनी सुनावलं.

हे सुद्धा वाचा

लोकं पाण्यासाठी वणवण भटकतात

पन्नास हजार टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात आहे. सेंट्रल वॉटर कमिशनची आकडेवारी आहे. मात्र आपले राजकारणी त्याकडे पाहात नाहीत. लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? असा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विचारला.

भारतात जी संपत्ती आहे त्यापासून प्रजा वंचित आहे. जनतेने काय पाप केले आहे? पाणी, भूमी, कोळसा आणि काम करणारे 140 कोटी जनता आहे. अमेरिका, चीन बलाढ्य आहेत. मात्र भारतात जी जमीन आहे ती ताकद आहे.

…तर अमेरिकेपेक्षा बलवान बनू

देशात निवडणुका झाल्या की कोणती तरी पार्टी जिंकते. मात्र जनता हरते. मित्र आता निवडणुका झाल्यानंतर जनता जिंकली पाहिजे. आपला भारत देश अमेरिकेपेक्षाही बलवान देश आहे. नेत्याचे काम इमानदार, दमदार असेल तर अमेरिकेपेक्षाही बलवान राष्ट्र बनू शकतो, असं मत के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं.

भारत बुद्धीजीवींचा देश आहे बुद्धूंचा नाही. देशात आणीबाणी लागली तेव्हा त्यावेळच्या मोठ्या नेत्यांना लोकांनी सहज उचलून फेकले. शेतकऱ्यांना आता केवळ नांगर चालवण्याची नव्हे तर लेखणी उचलण्याची आणि कायदे बनवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा झाली.या सभेत त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, देशात आज परिवर्तनाची गरज आहे. महाराष्ट्रात शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. ७५ वर्षांनंतरही देशात वीज आणि पाण्याचा प्रश्न आहे.

शेतकरी-कामगार एकत्र व्हावेत

अब की बार किसान सरकार, अशी घोषणाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते? शेतकरी-कामगार यांना एकजूट होण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी फक्त नांगर चालवू नये. लेखणी हातात घेतली पाहिजे. कायदा समजून घेतला पाहिजे. आता तुम्ही आमदार, खासदार व्हा, असा सल्ला त्यांनी दिला. असं केल्यास शेतकऱ्यांची सरकार येईल, असं ते म्हणाले.