Guru Gochar 2026: गुरू ग्रहाचा अखेर कर्क राशीत प्रवेश, 31 ऑक्टोबरपर्यंत या राशींवर होणार सकारात्मक परिणाम

ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर मांडलं जातं. त्याचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र माननारे सांगतात. ग्रहमंडळात गुरू ग्रहाचा गोचर सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. त्याला तशी कारणही आहेत. चला जाणून घेऊयात

Guru Gochar 2026: गुरू ग्रहाचा अखेर कर्क राशीत प्रवेश, 31 ऑक्टोबरपर्यंत या राशींवर होणार सकारात्मक परिणाम
Guru Gochar 2026: गुरू ग्रहाचा अखेर कर्क राशीत प्रवेश, 31 ऑक्टोबरपर्यत या राशींवर होणार सकारात्मक परिणाम
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Jun 02, 2026 | 3:11 PM

ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांसाठी मोठी घडामोड घडली असून त्याचा कुंडलीवर परिणाम होणार आहे. ज्योतिष्यांच्या मते गुरू गोचर काही राशींसाठी सकारात्मक, तर काही राशींसाठी नकारात्मक प्रभाव टाकणारा आहे. प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलली की चांगले वाईट परिणाम होत असतात. तसंच गुरू ग्रहाच्या गोचराबाबत आहे. गुरू ग्रहाने 2 जून 2026 रोजी  2 वाजून 25 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. ही गुरूची उच्च रास मानली गेली आहे. त्यामुळे हंस राजयोग तयार झाल्याचं ज्योतिष सांगतात. गुरू या स्थितीत 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर पुढच्या राशीत प्रवेश करेल. म्हणजेच सिंह राशीत जाईल. या दरम्यान, गुरू ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येणार असल्याने अस्ताला देखील जाणार आहे. 15 जुलै ते 9 ऑगस्ट हा गुरूच्या अस्ताचा कालावधी असणार आहे.

हंस राजयोग कसा तयार होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रह जेव्हा स्वत:च्या धनु किंवा मीन राशीत, अन्यथा उच्च रास असलेल्या कर्केत असेल तर हा योग तयार होतो. सद्यस्थितीत गुरू ग्रह हा कर्क राशीत विराजमान आहे. यामुळे हंस राजयोग तयार झाला आहे. यामुळे सुख, संपत्ती आणि कौटुंबिक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. पण गुरू तुमच्या राशीच्या कोणत्या स्थानात आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कर्क राशीत पहिल्या, मिथुन राशीत दुसऱ्या, वृषभ राशीत तिसऱ्या, मेष राशीत चौथ्या, मीन राशीत पाचव्या, कुंभ राशीत सहाव्या, मकर राशीत सातव्या, धनु राशीत आठव्या, वृश्चिक राशीत नवव्या, तूळ राशीत दहाव्या, कन्या राशीत अकराव्या आणि सिंह राशीत बाराव्या स्थानी असेल.

गुरू ग्रह कोणत्या स्थानी असेल तर लाभदायी ठरतो?

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रह पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानी असेल तर शुभ मानला जातो. म्हणजेच सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यात पाचव्या, सातव्या आणि नवव्या स्थानात अत्यंत शुभ फळ देते. पहिलं स्थान लग्न, दुसरं धन, चौथं सुख, पाचवं ज्ञान आणि संतती, सातवं विवाह आणि भागीदारी, नववं भाग्य, दहावं कर्म आणि अकरावं लाभ स्थान आहे. आता गुरू ग्रह ज्या राशीच्या स्थानात आता विराजमान त्या स्थानात तशी फळं मिळतील. दुसरीकडे, सहावं, आठवं आणि बाराव्या स्थानात गुरू फारसा प्रभावी नसतो. त्यामुळे या काळात आरोग्य, खर्च वाढेल आणि संघर्ष करावा लागू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us