Special Story | ‘दुसऱ्या लफड्याची तिसरी गोष्ट’; मुंडेंना राजकीय किंमत मोजावी लागणार?

| Updated on: Jan 17, 2021 | 9:54 AM

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने संपूर्ण आठवडा याच विषयाने व्यापून गेला. परळी पासून ते दिल्लीपर्यंतच्या वर्तमानपत्रांनी प्रकरणाची दखल घेतली. (Dhananjay Munde rape allegations)

Special Story | दुसऱ्या लफड्याची तिसरी गोष्ट; मुंडेंना राजकीय किंमत मोजावी लागणार?
धनंजय मुंडे
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने संपूर्ण आठवडा याच विषयाने व्यापून गेला. परळी पासून ते दिल्लीपर्यंतच्या वर्तमानपत्रांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर या प्रकरणात ट्विटस्टही आला. त्यामुळे मुंडे यांचं मंत्रीपद वाचलं. पण या निमित्ताने त्यांची राजकीय कारकिर्द डागाळली गेली. यातून मुंडे फिनिक्स पक्ष्यासारखे भरारी घेतील का? की हे प्रकरण आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवत राहील? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा धांडोळा. (Dhananjay Munde rape allegations special story)

प्रकरण काय आहे?

धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बलात्काराच्या आरोपांनंतर मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांनंतर फेसबुकवर पोस्ट करून, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबातील सर्वांना ही बाब माहिती आहे” असं मुंडे यांनी म्हटलं होतं. तसेच रेणू शर्मा (Renu sharma) यांनी केलेले बलात्काराचे आरोपही फेटाळून लावले होते.

‘गंभीर’ ते चौकशीनंतर निर्णय घेऊ

मुंडे यांच्या प्रकरणाची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दखल घेतली होती. त्यांनी स्वत: मीडियासमोर येत प्रकरण गंभीर असल्याचं सांगून मुंडेंच्या गच्छंतीचे संकेत दिले होते. पवारांच्या या विधानाने मुंडेंभोवतीचं संशयाचं वातावरण आणखीनच गडद झालं होतं. मुंडे याप्रकरणात दोषी असल्याच्या चर्चाही घडू लागल्या होत्या. त्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनिष धुरी यांनी रेणू शर्मावर उलट आरोप केल्याने मुंडेंना दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी पवारांनी मीडियासमोर येऊन प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. तक्रारदार महिलेवरच आरोप झाल्याचा हवालाही त्यांनी दिला. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. मुंडेंची जी काही नाचक्की व्हायची होती ती एव्हाना झालेली होती.

चंद्रकांतदादांनी मांडलेला ‘तो’ मुद्दा

पवारांकडून दिलासा मिळाल्याने मुंडेंना थोडं बळ मिळालं. पण त्यालाही काही तास उलटत नाही तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निराळाच मुद्दा उकरून काढून मुंडेंना पुन्हा गॅसवर आणून ठेवलं. रेणू शर्मांचे आरोप खरे की खोटे? रेणू यांनी इतरांना फसवलं की नाही? हा मुद्दा वेगळा आहे. त्याची चौकशी पोलीस करतीलच. त्याबद्दल आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतच नाही. पण मुंडे यांनी त्यांच्या विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यांनीच स्वत: सांगितलंय. कुणी त्यांच्यावर आरोप केलेला नाही. त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांनी या पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे मुंडे जाणार की राहणार? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बदनामी झेलायची की राजीनामा द्यायचा?

मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजपच्या महिला मोर्चाच्यावतीने येत्या सोमवारपासून राज्यभरात आंदोलने करण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयासमोर ही आंदोलने होणार आहेत. त्यामुळे मुंडे यांची आणखीनच बदनामी होणार आहे. हे प्रकरण जितके दिवस विरोधक लावून धरतील आणि मीडियात जितके दिवस येत राहील तेवढे दिवस मुंडेंसाठी कठिण असतील. त्यानंतरही सार्वजनिक जीवनात वावरताना मुंडेंना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सत्तेत राहून बदनामी झेलायची की राजीनामा देऊन या प्रकरणावर पडदा पाडायचा याचा निर्णय मुंडेंनाच घ्यावा लागेल, असं जाणकारांनी सांगितलं.

मुंडे हे हत्यार, खरा निशाणा ठाकरे सरकार?

भाजपने मुंडे प्रकरण तापवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंडे हे त्यांच्यासाठी एक हत्यार आहेत. विरोधकांचा खरा निशाणा ठाकरे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धर्म संकटात टाकणं ही त्यामागची खेळी आहे. मुंडेप्रकरण जेवढं तापेल तेवढी मुख्यमंत्र्यांची इमेजही खराब होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्याचा राग काढण्यासाठी शिवसनेला मुंडेंचं आयतच निमित्त मिळाल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

मुंडे पुन्हा भरारी घेतील?

जो बुँद से गयी वो हौदसे नही आती, असं म्हटलं जातं. हे खरं असलं तरी त्यातूनही धनंजय मुंडे बाहेर पडतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही बरखा प्रकरणी आरोप झाले होते. पण त्यातून ते सावरले. त्यांची राजकीय कारकिर्दही उंचावली. धनंजय मुंडेही या प्रकरणातून बाहेर पडतील, असं काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. तर काही जाणकारांच्या मते मुंडेंना याप्रकरणी राजकीय किंमत मोजावी लागेल. त्यातून त्यांना बाहेर पडणं कठिणच असेल, असं वाटतं.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

(Dhananjay Munde rape allegations special story)