
घरात देवपूजा करताना किंवा दिवा लावताना वापरल्या जाणाऱ्या वाती अनेकजण सहजपणे कचऱ्यात फेकून देतात. मात्र, धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार हे करणं शुभ नाही. दिवा हे केवळ प्रकाशाचं नाही, तर शुभ, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. दिव्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे जळलेल्या वातींचे महत्त्व वाढते, असं वेदांमध्ये सांगितलं आहे.
अध्यात्मिक मान्यतांनुसार, दिवा जळून झाल्यानंतर किंवा विझल्यानंतर वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा जमा झालेली असते. त्यामुळे त्या वाती कचऱ्याच्या डब्यात टाकल्यास, त्यांच्यासोबत घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते, असं मानलं जातं. त्यामुळे, नकळत होणारी ही चूक टाळायला हवी.
हातांनी वातींना स्पर्श न करता, त्या काळजीपूर्वक गोळा करून एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवाव्यात. या पवित्र धाग्यांचा योग्य विधी करणे आवश्यक आहे. गोळा केलेल्या वाती पौर्णिमा, अमावस्या, पर्व काळ, अष्टमी किंवा नवमी यांसारख्या शुभ दिवशी वापरा. या विशिष्ट दिवशी, सर्व गोळा केलेल्या वाती एका ठिकाणी ठेवा. त्यावर थोडा कापूर ठेवा. शक्य असल्यास, वातींवर तुपाचे दोन थेंब ओता. हे मिश्रण पुन्हा प्रज्वलित करा. या प्रक्रियेतून जी विभूती तयार होते, ती अत्यंत सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण मानली जाते.
त्यामुळे दिव्याच्या वाती केवळ कचरा नसून, त्या सकारात्मक ऊर्जेचं भांडार आहेत. त्यांना योग्य मान देऊन विधी केल्यास, घरातील सुख-समृद्धी कायम राहते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)