Shiv Sena : दडपशाहीचे संकट कायमच आहे, गणराया, देश ‘निर्भय’ कर; शिवसेनेचं साकडं विघ्नहर्त्याला, हल्ला भाजपवर

| Updated on: Sep 01, 2022 | 8:17 AM

Shiv Sena : आता कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसले तरी लसीकरणामुळे त्याचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह वाढला व गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषी मिरवणुकांतही त्याचे प्रतिबिंब उमटले.

Shiv Sena : दडपशाहीचे संकट कायमच आहे, गणराया, देश निर्भय कर; शिवसेनेचं साकडं विघ्नहर्त्याला, हल्ला भाजपवर
दडपशाहीचे संकट कायमच आहे, गणराया, देश 'निर्भय' कर; शिवसेनेचा जोरदार हल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: देशभरात काल विघ्नहर्त्या गणरायाचं (Ganesh Chaturthi Utsav) आगमन झालं आहे. अनेकांनी लाडक्या बाप्पांची पूजा अर्चा केली. काहींनी तर बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. तर काहींनी नवस केले आहेत. शिवसेनेनेही बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. मात्र, या प्रार्थनेतून शिवसेनेने (shivsena) केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे. कोरोनाचे (corona) संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील आणि देशातील सत्ताधारी हिंदू सण ‘मोकळे केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत. प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत. देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

‘कमाई आणि महागाई’चा ताळमेळ अशक्य

बेरोजगारी आणि सतत वाढणारी महागाई या कोंडीत त्याचाही श्वास गुदमरलेलाच आहे. नवीन रोजगार राहिला बाजूला, आहे तो रोजगारदेखील हातून जात असल्याने ‘कमाई आणि महागाई’ यांचा ताळमेळ लावता लावता त्याची घालमेल होत आहे. त्यात चालू महिनाभरापासून सणवारांची धामधूम सुरू झाली आहे आणि अन्नधान्यापासून कडधान्यापर्यंत, स्वयंपाकाच्या गॅसपासून मसाल्याच्या पदार्थांपर्यंत, भाजीपाल्यापासून फळांपर्यंत, पेट्रोल-डिझेलपासून दुधापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव दररोज नवीन उंची गाठत आहेत. मुंबईत तर सुटे दूध 1 सप्टेंबरपासून तब्बल 7 रुपयांनी महागणार आहे. रुपयाचे अवमूल्यन दिवसागणिक नया नीचांक गाठत आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय भावच जास्त

आता कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसले तरी लसीकरणामुळे त्याचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह वाढला व गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषी मिरवणुकांतही त्याचे प्रतिबिंब उमटले. गणरायाच्या आगमनासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. पुढील दहा दिवस महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत हाच उत्साह आणि चैतन्य दिसणार आहे. वातावरण श्रद्धेने भारलेले असणार आहे. हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधमुक्त केल्याने घडत आहे, अशी टिमकी काही मंडळी वाजवत असली तरी त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे, हे राज्यातील गणेशभक्तही ओळखून आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.