सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय, दर्शनाला जाणार असाल तर…
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून आणि खान्देश वासियांचे कुलदेवी असलेल्या सप्तशृंगी देवीचा मोठा भक्त वर्ग असून हजारो भाविक दररोज दर्शनासाठी वणी गडावर येत असतात.
![सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय, दर्शनाला जाणार असाल तर... सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय, दर्शनाला जाणार असाल तर...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/24190830/vani-devi.jpg?w=1280)
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीच्या (Saptashrungi Temple) संस्थानने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मूर्ती संवर्धनानंतर श्री भगवतीच्या पूजा-विधी संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. सप्तशृंगी (Saptashrungi Devi) मातेच्या मूर्तीवरून जवळपास बाराशेहून अधिक किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर दररोज होणारा पंचामृताचा अभिषेक श्री भगवतीच्या मूर्तीवर होणार नाहीये. मूर्ती संवर्धनाच्या दृष्टीने देणगीदार भाविकांनी अर्पण केलेल्या दानातून चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. जवळपास २५ किलो चांदीची ही मूर्ती असून दररोज आता पंचामृत आणि महापूजा याच मूर्तीची होणार आहे. श्री भगवतीच्या मूळ रूपाला कुठल्याही प्रकारची इजा किंवा बदल होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानच्या (Vani Trust) वतीने सांगण्यात आले आहे. वर्षानुवर्षे श्री भगवतीच्या मूळ रूपाचे भक्तांना दर्शन होत राहील या उद्देशाने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून आणि खान्देश वासियांचे कुलदेवी असलेल्या सप्तशृंगी देवीचा मोठा भक्त वर्ग असून हजारो भाविक दररोज दर्शनासाठी वणी गडावर येत असतात.
सप्तशृंगी देवीला श्री भगवती माता म्हणून ओळखले जातात, तर कुणी वणीची देवी म्हणून देखील ओळखतात. नवरात्रात लाखो भाविक पायी दर्शनाला येत असतात.
सप्तशृंगी देवीची स्वयंभू मूर्ती असल्याचे सांगतात, त्यामुळे नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
वणी गडावर ढगफूटीसदृश्य पाऊस झाल्याने गडावर श्री भगवतीच्या मूर्तीसह मंदिराचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे मूर्ती आणि मंदिर संवर्धनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आले होते.
त्यादरम्यान श्री भगवतीच्या मूर्तीवरून जवळपास बाराशेहून अधिक शेंदूर काढण्यात आला होता त्यानंतर श्री भागवतीची मूळ मूर्तीचे रूप बघायला मिळाले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला म्हणजेच घटस्थापनेला श्री भागवतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना मंदिर खुले होणार आहे.
त्यातच आता मूर्तीच्या मूळ रूपावर दररोज होणारा पंचामृत आणि पूजा-विधी पर्यायी देवीच्या चांदीच्या मूर्तीवर केला जाणार आहे. असून त्यासाठी २५ किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे.