Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी? …तर घरात कधीच निर्माण होत नाही वास्तुदोष

वास्तुशास्त्र हे एक घराशी संबंधित शास्त्र आहे, ज्यामध्ये घराची रचना कशी असावी? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्यातील काही ढोबळमानाने महत्त्वाच्या आणि ज्याची रचना चुकली तर घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, अशा गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी? ...तर घरात कधीच निर्माण होत नाही वास्तुदोष
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 9:35 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराची रचना जर चुकली असेल तर त्याचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही. आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराची आदर्श रचना कशी असावी, याबाबत काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण कोणतं असेल तर ते तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असतो. कारण याच दरवाजामधून तुमच्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचं तोंड हे नेहमी पूर्व दिशेला असावं, कारण पूर्व दिशा ही सूर्य देवता आणि देवांचा राजा इंद्र यांची दिशा असते, त्यामुळे या दिशेला धन, ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घराचा दरवाजा हा पूर्व दिशेलाच असावा, पूर्व दिशेला नसेल तर तो पश्चिम किंवा उत्तर दिशेला देखील चालेल. परंतु घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला कधीही नसावा. तसेच घराचा मुख्य दरवाजा हा घरातील इतर दरवाजांपेक्षा थोडा मोठा असावा.

हॉल – घराचा हॉल हा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा, जर घरात कोणी पाहुणे आले तर त्यांची बसण्याची व्यवस्था ही दक्षिण दिशेकडे किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून झाली पाहिजे, अशा पद्धतीने हॉलची रचना असावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

देवघर – तुमच्या घरातील आणखी एक महत्त्वाची जागा म्हणजे तुमच्या घरात असलेलं देवघर, कारण देवघरातून सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते, त्यामुळे या ऊर्जेचा योग्य परिणाम साधण्यासाठी वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार तुमच्या घरातील देवघराची रचना असणं गरजेचं असतं. देवघराची रचना ही अशी असावी की जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसला तेव्हा तुमचं तोंड हे पश्चिमेकडे असावं आणि देवघर हे पूर्वेला असावं.

स्वंयपाक घर – वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वंयपाक घर हे नेहमी अग्नेय दिशेला असावं, कारण ही दिशा अग्नी देवताची दिशा मानली जाते. जर तुमचं किचन हे अग्नेय दिशेला असेल तर तुमच्यावर सतत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो. घरात कधीही अन्न-धान्य कमी पडत नाही.

बेडरुम – बेडरुम ही नेहमी नैऋत्य कोपऱ्यात असावी, यामुळे घराला स्थैर्य प्राप्त होतं, तुमच्यामध्ये नेतृत्व गुण वाढतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)