Vastu Shastra : दिवसेंदिवस तणाव वाढतच चाललाय का? मग घरात हे तीन बदल करा, मनावरचा ताण होईल दूर
स्पर्धा प्रचंड वाढली आहे, आज स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या जगात प्रत्येकजण धडपडत आहे. नोकरी, व्यवसायामध्ये देखील प्रचंड स्पर्धा आहे. याचा परिणाम हा आपल्या रोजच्या जीवनावर होत असून, त्याचा मोठा तणाव आपल्या मनावर निर्माण होतो.

पूर्वीच्या काळात स्पर्धा नव्हती, जीवनशैली ही खूप संथ होती. स्वत:ला सिद्ध करण्याची एवढी महत्त्वकांक्षा देखील नव्हती. जेवढं उत्पन्न मिळेल, तेवढ्यात लोकं समाधानी होते. मात्र आता काळ बदलला आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला सर्वत्र तीव्र स्पर्धा असल्याचं पहायला मिळेल. आज प्रत्येक जण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे, दिवस रात्र कष्ट करत आहे. यामुळे तुमचं तुमच्या शरीराकडे देखील दुर्लक्ष होतं. मनावर प्रचंड ताण येतो. व्यवसाय आणि नोकरीमध्ये तर एवढी स्पर्धा वाढली आहे की, तुम्हाला जर त्यामध्ये टिकून राहायचं असेल तर त्या क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण तुमच्यावर असतं. आज लोकं समाधानी नाहीत, जर एखाद्याला घर चालेल एवढा पगार असेल तर त्याला अधिक पैशांची अपेक्षा असते, त्यामुळे तो अधिक कष्ट करतो. अनेकांना नोकरी मिळत नाहीये, अनेकांचं वय उलटून गेलं तरी लग्न झालेलं नाही. या सर्व गोष्टींचा तणाव मनावर असतो.
मग हा तणाव दूर कसा करायचा तर त्यासाठी अध्यात्मिक मार्गाची मदत तुम्ही घेऊ शकता, एखाद्या मंदिरात गेलात, तिथे चिंतन केलं, देवाची शांत मनाने प्रार्थना केली तर निश्चितच काही काळ तुम्हाला तुमच्या मनावरील तणाव दूर झाल्याची प्रचिती तुम्हाला येते. वास्तुशास्त्रात देखील मनावरील तणाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
घरात लावा ही झाडं – जर तुम्हाला वाटत असेल तुमचं मन अस्वस्थ आहे. तुमच्या मनावर प्रचंड ताण आला आहे, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही घरात तुळशीचं झाड लावा, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल, तुळशी प्रमाणेच तुम्ही तुमच्या घरात मनातील ताण कमी करण्यासाठी लकी बाम्बुचं झाड देखील लावू शकता.
घराची रंगसंगती – वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीला कधीही भडक रंग देऊ नये, कारण त्याचा तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो, घराला नेहमी हलके लाईट रंग द्यावेत असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मनाला शांत वाटतं, तणाव दूर होतो.
घराची स्वच्छता – त्याचप्रमाणे घर नेहमी स्वच्छ असावं, घरात कुठेही राडा किंवा कचरा नसावा, घरात येताच प्रसन्न वाटलं पाहिजे, घर जर स्वच्छ असेल तर तुमच्या मनावरील ताण आपोआप दूर होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
