अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहू नये? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
अग्निसंस्कार झाल्यानंतर लोक मागे वळून का पाहत नाहीत. काय आहे ही नेमकी प्रथा आणि यामागील कारण? जाणून घ्या सविस्तर

Garud Puran : हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कारांना विशेष महत्त्व दिले जाते. यापैकी अंत्यसंस्कार हा जीवनातील अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक नियम आणि परंपरा धर्मग्रंथांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे अग्निसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये. या प्रथेचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक कारण गरुड पुराणात सविस्तरपणे सांगितले आहे.
गरुड पुराणानुसार, भगवान विष्णूंनी गरुडाला मृत्यू, आत्म्याचा प्रवास, यमलोक, पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या गूढ विषयांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांपासून बनलेले शरीर नष्ट होते, मात्र आत्मा अमर असतो.
अंतिम संस्कारानंतर मागे वळून का पाहू नये?
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनीही आत्म्याच्या अमरत्वाबाबत सांगितले आहे. ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः’ या श्लोकानुसार आत्म्याला कोणतेही शस्त्र छेदू शकत नाही आणि अग्नी जाळू शकत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर शरीराचा अंत झाला तरी आत्म्याचे अस्तित्व कायम राहते अशी धार्मिक मान्यता आहे.
गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे, मृत्यूनंतर काही आत्मे आपल्या कुटुंबीयांबद्दलच्या प्रेमामुळे आणि मोहामुळे त्यांच्याभोवतीच रेंगाळत राहतात. हा मोह आत्म्याच्या पुढील प्रवासात अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे अग्निसंस्कारानंतर नातेवाईकांनी मागे वळून पाहू नये अशी प्रथा रूढ झाली आहे. यामुळे आत्म्याला हे संकेत मिळतात की त्याचे या जगाशी असलेले नाते संपले असून आता त्याने पुढील प्रवासाला निघावे.
मृत्यूनंतरचे तेराव्या दिवसापर्यंतचे विधी
धार्मिक मान्यतेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्मशानभूमीकडे मागे वळून पाहिले तर मृत आत्म्याचा मोह अधिक वाढू शकतो. त्यामुळे आत्मा या जगातच अडकून राहण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. याउलट मागे न पाहिल्यास आत्म्याला संसारातील बंधनांपासून मुक्त होऊन पुढे जाण्यास मदत होते.
याच कारणामुळे मृत्यूनंतरचे तेराव्या दिवसापर्यंतचे विधी, पिंडदान, श्राद्ध आणि इतर कर्मकांड करण्यात येतात. या विधींचा उद्देश आत्मा आणि त्याच्या कुटुंबीयांमधील सांसारिक बंध हळूहळू कमी करणे हा असल्याचे धर्मग्रंथांमध्ये नमूद केले आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)