
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट अखेर गोड झाला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं नाही जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच चालली. त्यामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. खरं तर या संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची कामगिरी हवी झाली नव्हती. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. दक्षिण अफ्रिकेविरूद्धही फक्त 15 धावाचं खेळी केली. झिम्बाब्वेविरूद्ध 55 धावा केल्या, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रूळावरून गाडी घसरली आणि 10 धावांवर बाद झाला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध अभिषेक शर्मा 9 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे अंतिम फेरीत त्याला संघात जागा देऊ नका अशी ओरड होऊ लागली. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्यावर विश्वास टाकला. अखेर अंतिम फेरीत त्याची बॅट तळपली.
अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 247.62 चा होता. खरं तर या स्पर्धेत अभिषेक शर्माचा मनोबल ढासळलं होतं. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने संघातील स्थान डळमळीत झालं होतं. पण इतर खेळाडू त्याला आत्मविश्वास देत होते. अंतिम सामन्यातील विजयानंतर अभिषेक शर्माने एक मोठा खुलासा केला आहे. अभिषेक शर्माने सांगितलं की अंतिम फेरीत दुसऱ्याच्या बॅटने फलंदाजी केली. म्हणजेच दुसऱ्या खेळाडूकडून बॅट उधार घेऊन फलंदाजी केली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिवम दुबे होता. शिवम दुबेच्या बॅटने त्याने अंतिम फेरीत फटकेबाजी केली.
अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘आज मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहीजे. गिल सोबत नव्हता म्हणून मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. धन्यवाद दुबे.’ अभिषेक शर्मा जेव्हा वाईट काळ सुरू असतो तेव्हा कोणाकडून काही ना काही घेतो. याच स्पर्धेत अभिषेक शर्मा मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून उतरला होता. पण त्यावेळी लक काही चाललं नाही. अंतिम सामन्यात दुबेची बॅट लाभली असं म्हणायला हरकत नाही.