IPL 2022: दुखापतीमुळे टीम इंडियातील एक महत्त्वाचा खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता
IPL 2022: आयपीएलच्या या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये संधी मिळू शकते. बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे सदस्य आयपीएलमध्य़े खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सीजन (IPL) संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) आपली पहिली मालिका खेळणार आहे. पाच टी 20 सामन्यांची ही मालिका आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये संधी मिळू शकते. बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे सदस्य आयपीएलमध्य़े खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या काही सिनियर खेळाडूंना डच्चू सुद्धा मिळू शकतो. त्याचवेळी खेळाडूंच्या दुखापती सुद्धा टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतात. मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय. त्याला स्नायुंची दुखापत झाली आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीचे दोन सामनेही सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.
ही शक्यता धुसर
आयपीएलमध्ये खेळत नसल्याने सूर्यकुमारला विश्रांती मिळेल, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध होईल ही शक्यता धुसर आहे. सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकू शकतो.
दुखापत थोडी गंभीर
“सूर्यकुमार यादवची दुखापत थोडी गंभीर आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेलाही मुकावे लागू शकते. तो पूर्णपणे फिट नसेल, तर आम्ही त्याच्या निवडीची घाई करणार नाही” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं. “सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याआधी सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबद्दल माहिती देण्यात आली. तो आयपीएल 2022 चा उर्वरित सीजन खेळू शकणार नाहीय” असं मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आलं.
NCA मध्येच आता नेमकं काय ते समजेल
सध्या सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. रिहॅबसाठी पुढच्या आठवडयात तो राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनी (NCA)मध्ये जाणार आहे. “एकदा तो NCA मध्ये आला की, आम्हाला त्याच्या दुखापतीची नेमकी कल्पना येईल. त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. तो पुढच्या आठवड्यात NCA मध्ये येईल. भारताच्या T 20 वर्ल्ड कप संघातील तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही घाई करणार नाही” असं निवड समितीच्या सदस्याने सांगितलं.