
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) पदाधिकारी, अॅपेक्स कौन्सिल आणि टी20 मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका 12 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने रंगत वाढली आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा या लढतीत आहेत. इतकंच काय तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनीही अर्ज केला होता. पण अध्यक्षपदाची निवडणूक ही सर्वात चुरशीची होती. कारण राजकीय डावपेचात कोण बाजी? मारणार याची उत्सुकता होती. पण अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना भाजपा नेते प्रसाद लाड एमसीए कार्यालयात पोहोचले. तसेच एमसीए अध्यक्ष दालनात अजिंक्य नाईक, प्रसाद लाड यांच्यात बैठक झाली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्षपद मिळालं आहे. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याचं दिसून आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमसीएचं अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार आणि आशिष शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. रविवारी रात्रीपासूनच सर्व घडामोडी सुरू होत्या. तिन्ही नेते एकमेकांशी संपर्कात होते. या नेत्यांनी सामंजस्यपणे पावलं उचलण्याचं ठरवलं असं सांगण्यात येत आहे.
डायना एडल्जी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. एडल्जी या एकमेव क्रिकेटर उमेदवार होत्या. तसेच जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. अध्यक्षपदाबाबत अद्याप कोर्टाचा निर्णय न आल्याने ही विनंती केली आहे. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. शहर दिवाणी न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शाहआलंम शेख यांनी अजिंक्य नाईक याच्या उमेदवारीला आव्हान दिलं होतं. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नसल्याचा शहाआलंम शेख यांचा दावा आहे. तर सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळ एकच असल्याने कोणत्याही नियमांच उल्लंघन झाल नसल्याचं अजिंक्य नाईक यांचा दावा आहे.
अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी 9, सचिवपदासाठी 10, सहसचिवपदासाठी नऊ आणि खजिनदार पदासाठी 8 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कार्यकारीणी पदासाठी 48 अर्ज आले आहेत.