
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत मेन्स टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बुधवारी 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सवर मात केली. टीम इंडियाने यासह साखळी फेरीत सलग चौथा विजय मिळवला. आता टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुपर 8 फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात 19 धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. महिला ब्रिगेडला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दुहेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाचं खातं उघडलं. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत आव्हान कायम राखत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा, निर्णायक आणि अंतिम सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ओपनर जॉर्जिया वॉल हीने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 163 धावांपर्यंत पोहचता आलं. जॉर्जियाने 57 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 11 फोरसह 88 रन्स केल्या. तर बेथ मुनी हीने 46 धावांचं योगदान दिलं. एश्ले गार्डनर हीने नाबाद 10 धावा केल्या. तर फोबी लिचफिल्ड 6 आणि एलिसा पेरी हीने 7 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियासाठी अरुंधती रेड्डी हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर रेणुका सिंह ठाकुर हीने 1 विकेट मिळवली.
शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना या सलाम जोडीने भारताला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र भारताच्या 57 धावा असताना शफाली आऊट झाली. शफालीने 29 धावा केल्या. शफालीनंतर तिसऱ्या स्थानी आलेली जेमिमाह रॉड्रिग्स 4 धावा करुन मैदानाबाहेर गेली. झटपट 2 विकेट्स गेल्याने भारताला स्मृतीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र स्मृतीनेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला. स्मृतीने 31 धावा केल्या. स्मृती आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 9.4 ओव्हरमध्ये 3 आऊट 71 असा झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताला अप्रतिम सुरुवातीनंतर झटपट 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. मात्र कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष ही जोडी मैदानात असल्याने भारताला विजयाचा विश्वास होता. या दोघींनीही अर्धशतकी भागीदारी करत भारतीय चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 43 बॉलमध्ये 55 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर दोघीही आऊट झाल्या. हरमनप्रीतने 30 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. तर ऋचाने 19 धावा जोडल्या. त्यानंतर लोअर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने यासह भारताला 20 ओव्हरमध्ये 9 झटके देत 144 धावांवर रोखलं आणि 19 रन्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी एश्ले गार्डनर हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर किम गार्थ, अनाबेल सदरलँड आणि कॅप्टन सोफी मोलिनेक्स या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.