आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेबाबत आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींनी सपोर्ट स्टाफमध्ये भरणा सुरु केली आहे. दिग्गज खेळाडूंसह नवी रणनिती आखली जात आहे. असं असताना यंदाच्या आयपीएलमध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार की नाही? असा प्रश्न समोर आला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 Auction
| Updated on: Sep 27, 2024 | 5:58 PM

आयपीएल 2025 स्पर्धा सर्वार्थाने चर्चेत आली आहे. रिटेंशन आणि मेगा लिलावामुळे या स्पर्धेला आधीच रंगत चढली आहे. असं असताना आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार की नाही? याबाबत खलबतं सुरु आहेत. आयपीएलने प्रत्येक पर्वासाठी सामन्यांची संख्या सूचीबद्ध केली होती. त्यानुसार टप्प्याटप्याने सामन्यांची संख्या 94 पर्यंत घेऊन जाण्याचा विचार आहे. यासाठी 2025 आणि 2026 या पर्वात सामन्यांची संख्या 74 वरून 84 करण्याचं ठरलं होतं. पण आता ही संख्या 74 राहील असं सांगण्यात येत आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या पर्वात 74 सामने खेळले जातील. म्हणजेच 2022 या वर्षी ठरवलल्या सामन्यांपेक्षा 10 सामने कमी होतील. टेंडर दस्ताऐवजानुसार, आयपीएलमध्ये 2023-2024 स्पर्धेसाठी 74 सामने, 2025-2026 साठी 84 सामने आणि 2027 साठी 94 सामन्यांचा विचार केला गेला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये असं काय घडलं की, फक्त 74 सामने खेळवले जातील. त्याबाबतचा उल्लेखही रिपोर्टमध्ये केला गेला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयपीएलने 2025 या वर्षात 74 सामनेच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण असं आहे की, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांचा कामाचा ताण हाताळण्यास मदत होईल. तसेच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच अंतिम फेरीसाठी फेव्हरेट मानला जात आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यांच्या तयारीसाठी पुरेशी विश्रांती देण्यासाठी हा विचार करत आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी मागच्या महिन्यात आयपीएल सामन्यांबाबत केलेलं वक्तव्यही महत्त्वाचं ठरणार आहे.

बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं होतं की, ‘आम्ही आयपीएल 2025 मध्ये 84 सामने आयोजित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, कारण सामन्यांची संख्या वाढल्यामुळे खेळाडूंवर वाढणारा ताण आम्हाला लक्षात ठेवावा लागेल.’ त्यामुळे 84 सामने हा कराराचा भाग असला तरी यंदा 74 सामने खेळवायचे की 84 हे ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय हा बीसीसीआयकडे आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं होतं.