बीसीसीआय निवडकर्त्यांनी अचानक घेतली मोहम्मद शमी भेट, नेमकं काय घडलं?
भारतीय संघात पुनरागमनासाठी मोहम्मद शमी प्रयत्न करत आहे. यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असून चमकदार कामगिरीही केली. पण त्याच्या फिटनेसवरून सध्या बीसीसीआय निवड समितीत संभ्रम आहे. असं असताना बीसीसीआय निवडकर्त्याने त्याची भेट घेतली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. शमी जवळजवळ आठ महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर आहे.टीम इंडियात पुनरागमनासाठी त्याची धडपड सुरु आहे. त्यामुळे देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळत आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं. इतकंच काय तर 7 विकेट घेऊन गोलंदाजीची धार कायम असल्याचं दाखवून दिलं. पण त्याच्या फिटनेस अपडेटबाबत बीसीसीआय निवडकर्त्यांना फार काही माहिती नसल्याचं मधल्या काळात दिसून आलं. त्यावरून मोहम्मद शमी आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. असं असताना रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात खेळत असलेल्या मोहम्मद शमीची निवड समिती सदस्यांनी भेट घेतली. त्यामुळे अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे.
स्पोर्ट्सक्रीडामधील एका वृत्तानुसार, रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आरपी सिंगने शमीची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा रंगली. आरपी सिंगचा नुकताच निवड समितीत समावेश झाला आहे. तथापि, भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही. माध्यमांसमोर बीसीसीआयविरुद्धच्या त्याच्या जाहीर विधानांवर चर्चा केली असावी. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. त्यामुळे शमीचा विचार केला जात असावा, असं बोललं जात आहे. 14 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ लवकरच जाहीर केला जाईल. तत्पूर्वी त्याच्याशी चर्चा झाली असावी.
निवडकर्ते रणजी ट्रॉफी सामने पाहण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. विशेष म्हणजे संघात निवड होईल असा खेळाडूंचा फॉर्म पाहिला जातो. त्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाली असावी अशी चर्चा आहे. पण शमी आणि आगरकरमधील शाब्दिक युद्धामुळे ही चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. आगरकरने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, मोहम्मद शमी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात पाठवू इच्छित होतो. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठीही त्याचा विचार केला होता. पण त्याचं फिटनेस तेवढं नव्हतं. अजित आगरकरच्या या विधानानंतर शमीने प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे हा वाद पेटला होता.
