
हरमप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया रविवारी 12 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि सलग तिसरा विजय मिळवला. कॅप्टन एलिसा हीली हीने ऑस्ट्रेलिया विजयात प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावांची खेळी केली. भारताला अशाप्रकारे 330 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतरही कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टीम इंडिया मायदेशात होत असलेल्या या वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह खेळत आहे. त्यामुळे भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवतेय. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात ही उणीव प्रकर्षणाने जाणवली. यावर आम्ही याबाबत विचार करु. मात्र 2 पराभवांच्या आधारावर कोणता निर्णय व्हायला नको असं हरमनप्रीतने म्हटलं.
“आम्ही बसू आणि यावर विचार करु. या कॉम्बिनेशनने आम्हाला विजयी केलं आहे. 2 खराब सामन्यांमुळे फरक पडणार नाही. आम्हाला पुढे अनेक मुद्द्यांवर काम करायचं आहे. आम्ही सर्वच सकारात्मक दृष्टीकोनातून खेळू”, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीतने सामन्यानंतर दिली.
दरम्यान टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने भारतासाठी दीडशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर टीम इंडियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 294 रन्स केल्या. त्यामुळे भारताला 360-370 धावा करण्याची नामी संधी होती. मात्र इथेच गेम झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताच्या उर्वरित 6 विकेट्स या 36 धावांच्या मोबदल्यात मिळवल्या. त्यामुळे टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला 48.5 ओव्हरमध्ये 330 रन्सवर ऑलआऊट केलं.
“ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्यानुसार 30-40 धावा करण्याची गरज होती. मात्र शेवटच्या 6 ओव्हरमध्ये धावा झाल्या नाहीत. त्याचाच फटका बसला. ही खेळपट्टी बॅटिंगसाठी फायदेशीर होती. मात्र शेवटच्या 6 ओव्हरमध्ये फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली”, असंही हरमनप्रीतने सामन्यानंतर बोलताना नमूद केलं.