Champions Trophy 2025 : बीसीसीआयची भूमिका पाहून पीसीबीने केली अशी मागणी, आता टीम इंडियाला द्यावा लागणार पुरावा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पुढची आयसीसी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. पण या स्पर्धेत भारतीय संघ भाग घेणार नाही अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे बीसीसीआयकडे थेट पुरावाच मागितला आहे.

Champions Trophy 2025 : बीसीसीआयची भूमिका पाहून पीसीबीने केली अशी मागणी, आता टीम इंडियाला द्यावा लागणार पुरावा
| Updated on: Jul 15, 2024 | 6:35 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा प्रारुप आराखडा पाकिस्तान बोर्डाने आयसीसीकडे सोपवला आहे. या प्रारुप आराखड्यावर अजून तरी आयसीसीकडून मोहोर लागलेली नाही. दरम्यान भारतीय संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बीसीसीआयकडून हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा भरवण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दहशतवाद प्रोत्साहन देत असल्याने भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची संपूर्ण जगासमोर नाचक्की होणार आहे. पण बीसीसीआयने या सर्व चर्चांबाबत अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही. पण या वावड्या उठल्या असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक नवी मागणी समोर ठेवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे पुरावा मागितला आहे. जर भारत सरकारकडून परवानगी नाही तर आयसीसीकडे तसं लेखी द्यावं अशी मागणी केली आहे.

भारत सरकार सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला पाकिस्तानात पाटत नाही असं बीसीसीआयने लेखी आयसीसीकडे द्यावं. पीटीआयला पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. या दरम्यान आयसीसीची वार्षिक बैठक 19 जुलैला कोलंबोत होणार आहे. यावेळी हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकतो. बीसीसीआय हायब्रिड मॉडेलनुसार भारतीय संघाचे सामने यूएईत खेळण्यासवर जोर देईल. आशिया कप स्पर्धाही हायब्रिड मॉडेलवर खेळवली गेली होती. तेव्हा भारतीय संघ श्रीलंकेत सामने खेळला होता.

पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रारूप वेळापत्रक आयसीसीकडे सोपवलं आहे. यात भारतीय संघाचे सर्व सर्व सामने लाहोरमध्ये होतील हे स्पष्ट केलं आहे. यात उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामनाही लाहोरमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होईल. तर भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला होणार आहे. अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता. तेव्हापासून भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. दुसरीकडे, आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तान संघ भारतात आला आहे.