मोठी खळबळ… सुनेत्रा पवार, पार्थ यांना न सांगताच पटेल, तटकरे यांनी… राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घडलं काय?
Sunetra Pawar- Sunil Tatkare- Praful Patel: परवा जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्याचवेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण या भेटीवरून आता पक्षातच मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

Sunetra Pawar- Sunil Tatkare- Praful Patel: अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात संवादाची मोठी पोकळी निर्माण झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर पक्षात सुनेत्रा पवार, पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असा चित्र तयार झाल्याचेही समोर आले आहे. पक्षातील वरिष्ठ वर्तुळातील ही नाराजी यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यातच अजून एका प्रकरणाची भर पडली आहे. परवा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण पक्षाला याची साधी माहितीही नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. पक्षातील बेबनाव या घडामोडींमुळे समोर आला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीत हा विषय चर्चिला गेल्याचे समजते.
सुनेत्रा पवार भेटीबद्दल अनभिज्ञ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते ही माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूणच या प्रकारामुळे पक्षातील नाराजी उघड झाली आहे. पक्ष नेतृत्वाला कोणतीही कल्पना न देता दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत समोर आली.
सुनील तटकरे यांनी दिली माहिती
काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीला हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात ही बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याची माहिती सुनील तटकरे यांनी या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जयंत पाटीलही त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे सुद्धा त्यांच्या भेटीला पोहचले होते. जयंत पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला का गेलो होतो, याचा क्रमवार तपशील मांडला आहे. त्यांनी पटेल आणि तटकरे हे तिथे होते की नाही याची कल्पना नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहे. तर या दोघांशी भेट झाल्याचे वृत्तही फेटाळले आहे. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना पदावरून हटवल्यासंदर्भात आपण फडणवीस यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
