फक्त नावच नाही, कामगिरीही ‘अजिंक्य’, रहाणेच्या नेतृत्वात भारताला पराभूत करणं ऑस्ट्रेलियासाठीही अशक्य, पाहा आकडेवारी
भारताच माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या 1072 दिवसांपासून टीम इंडियापासून दूर होता. त्यानंतर गुरूवारी इमोशनल पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. इतकंच काय तर आयपीएलही खेळणार नाही.

Ajinkya Rahane Retire from Cricket: भारतीय कसोटी संघाचा यशस्वी कर्णधार अशी ख्याती असलेला अजिंक्य रहाणे यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेत यापुढे अजिंक्य रहाणे खेळणार नाही. रहाणेने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारतासाठी अजिंक्य रहाणेने 12 वर्षे क्रिकेट खेळला. यात त्याने 85 कसोटी, 90 वनडे आणि 20 टी20 सामने खेळला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थानच मिळालं नाही. 1072 दिवसानंतर अखेर अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली. अजिंक्य रहाणेचं क्रिकेट कारकिर्द ही 19 वर्षांची राहिली. यात 205 फर्स्ट क्लास सामने, 192 लिस्ट ए आणि 308 टी20 सामने खेळला आहे. अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलं आहे. 2020-21 मध्ये पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत त्याच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. ही कसोटी मालिका संस्मरणीय राहिली.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वापुढे ऑस्ट्रेलियाची दमछाक
ऑस्ट्रेलिया खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेता भारताची सुरूवात निराशाजनक झाली होती. एडिलेडमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 36 धावांवरच बाद झाला होता. हा कसोटी सामना गमावला आणि कर्णधार विराट कोहलीही दुखापतीमुळे मालिकेतील पुढच्या सामन्यांना मुकला होता. मालिकेत 0-1 स्थिती असताना अजिंक्य रहाणेच्या हाती कमान आली. त्यानंतर त्याच्या नेतृत्वात भारताने उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकले आणि मालिका 2-1 ने खिशात घातली. खरं तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्व ऑस्ट्रेलियाला कायम ज़ड गेलं आहे. त्याची कर्णधारपदाची आकडेवारी पाहता असंच म्हणावं लागेल. कारण त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कधीच भारताला पराभूत केलं नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यात अजिंक्य रहाणेने नेतृत्व केलं. यात पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून नमवलं. दुसऱ्या सामना अनिर्णित राहिला. तिसऱ्या सामन्यात म्हणजेच गाबा कसोटीत भारताने 3 गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यासह चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळेत कसोटी सामन्याचं नेतृत्व केलं होतं. अजिंक्य रहाणेने पहिल्यांदा धुरा हाती घेतली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता.
2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी मालिकेत त्याने संघाचं नेतृत्व सांभाळलं. या सामन्यात अफगाणिस्तानला एक डाव 262 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर 2021 मध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तेव्हा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती. तेव्हा हा सामना अनिर्णित राहिला होता.