झिम्बाब्वेला मालिकेत नमवून भारताने इंग्लंडचा हिशेब केला पूर्ण, 14 दिवसातच इंग्रजांना शिकवला धडा
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. मात्र या मालिकेतून दोन सामन्यानंतर भारताने इंग्लंडचा हिशेब चुकता केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला आयसीसी क्रमवारीत मोठा फटका बसला होता. मात्र त्याची वसुली झिम्बाब्वे मालिकेत केली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 विजेत्या संघाची स्थिती पाहून गेल्या काही दिवसात क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवल्यानंतर खेळल्या गेलेल्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिकाही गमावली. त्यामुळे आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचं स्थान घसरलं होतं. इंग्लंडने भारताला 4-0 ने पराभूत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना ही बाब मनाला लागली होती. असं असताना भारताने झिम्बाब्वे दौऱ्यात ही स्थिती सुधारत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिका दोन सामन्यानंतरच जिंकली आणि आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पुन्हा मिळवलं आहे.
भारत टी20 क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी
भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका जिंकली आहे. यासह आयसीसी टी20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. 14 दिवसांपूर्वी 11 जुलैला भारताला इंग्लंडकडून टी20 मालिकेत 4-0 ने मात मिळाली होती. त्यामुळे भारताचं पहिलं स्थान गेलं होतं. आता दोन आठवड्यांनी भारताने नुकसान भरून काढलं आहे. ताज्या रँकिंगनुसार दोन्ही संघांचं गुणांकन हे 268 आहे. पण आता भारताने इंग्लंडला मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं आहे. तर इंग्लंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला तर गुणांकनात आणखी फरक पडेल आणि इंग्लंडच्या पुढे निघून जाईल. इंग्लंडची टी20 मालिका आता तरी नाही. इंग्लंडची पुढची पुरुष टी20 मालिका श्रीलंकेविरुद्ध असून ती सप्टेंबर 2026 मध्ये खेळवली जाणार आहे. श्रीलंका संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.त्यामुळे भारताला पहिल्या स्थानी राहण्याची संधी आहे.
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. आता झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न असेल. भारताचा तिसरा सामना रविवारी 26 जुलैला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन ते तीन बदल करण्याची शक्यता आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने याबाबतचे संकेत आधीच दिले आहेत.