
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपदाचा मानकरी कोण असणार? याची उत्सुकता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच लागली आहे. टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यापासून आतापर्यंत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे.पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अद्यापपर्यंत यजमान देश जिंकलेला नाही. इतकंच काय तर गतविजेता संघाला आपलं जेतेपद कायम ठेवता आलेलं नाही. पण 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चित्र बदलण्याची शक्यता आहे. स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंना सूरही गवसला आहे. त्यामुळे टीम इंडिया जेतेपद जिंकेल अशी आशा आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यांच्याकडून वर्ल्डकप स्पर्धेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पण या सर्वात एक खेळाडू टीम इंडियासाठी हुकूमाचा एक्का ठरू शकतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर अष्टपैलू हार्दिक पांड्या आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने हार्दिक पांड्या सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना वगळता सर्व सामने भारतातच होणार आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचं ठरेल. हार्दिक पांड्याची भारतातील आकडेवारी पाहता तसंच म्हणावं लागेल. अभिषेक आणि सूर्यापेक्षा या आकडेवारीत हार्दिक पांड्या उजवा ठरतो. हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते.
टी20 वर्ल्डकप 2024 पासून आतापर्यंत टीम इंडियाने भारतात 4 टी20 मालिका खेळल्या. या चार पैकी तीन मालिकेत हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट हा 180 पेक्षा जास्त आहे. त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. चार टी20 मालिकेत त्याचा इकोनॉमी रेट खूपच चांगला आहे. त्याने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आतापर्यंत खेळलेल्या चार मालिकांमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. यात फक्त एकाच मालिकेत त्याचा इकोनॉमी रेट हा 9 च्या वर आहे. त्यावरून त्याच्या गोलंदाजीची धार काय आहे ते दिसून येते. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विरोधकांसाठी हार्दिक पांड्या धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही.