Ramiz Raja: रमीज राजाने टीम इंडियाबद्दल बोलताना मर्यादा ओलांडली, हे काय बोलून गेला?

Ramiz Raja: PCB च्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर रमीज राजा आपल्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी भारताविरुद्ध गरळ ओकतोय.

Ramiz Raja: रमीज राजाने टीम इंडियाबद्दल बोलताना मर्यादा ओलांडली, हे काय बोलून गेला?
pcb ramiz raja
Image Credit source: instagram
| Updated on: Dec 29, 2022 | 12:41 PM

लाहोर: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीज राजाला पीसीबीच्या चेअरमन पदावरुन बर्खास्त करण्यात आलं. खुर्ची गेल्यानंतर रमीज राजा भारताबद्दल बोलताना जास्तच आक्रमक झालाय. रमीज राजाची विधानं ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतय. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय टीममध्ये तोडफोड झाल्याचा दावा रमीज राजाने केलाय. पाकिस्तानचा विजय बीसीसीआयला पचला नाही. म्हणूनच त्यांनी चीफ सिलेक्टर, सिलेक्शन कमिटी आणि कॅप्टनलाच बदललं, असं रमीज राजा म्हणाला.

भारताची एक अब्ज डॉलरची इंडस्ट्री मागे पडली

“पाकिस्तानने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये कमालीच प्रदर्शन केलय. पाकिस्तानची टीम आशिया कपच्या फायनलमध्ये खेळली. भारतीय टीम फायनल खेळू शकली नाही. भारताच्या एक अब्ज डॉलरच्या इंडस्ट्रीला पाकिस्तानमुळे पिछाडीवर रहाव लागलं. त्यानंतर भारतात तोडफोड झाली. त्यांनी आपला चीफ सिलेक्टर, सिलेक्शन कमिटीच बदलून टाकली. कॅप्टन बदलला. पाकिस्तान आपल्यापुढे कसा निघून गेला, हे त्यांना पचलं नाही” असं रमीज राजा सुनो टीव्हीशी बोलताना म्हणाला.

पाकिस्तानात माझ्यासोबत अन्याय

पाकिस्तानात माझ्यासोबत अन्याय झालाय, असही रमीज राजा म्हणाला. “मी टीमला एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी बाबर आजमला सशक्त बनवल. कॅप्टन मजबूत असेल, तर तुम्हाला रिझल्ट मिळतात. आम्ही रिझल्ट दिलाय” असं रमीज राजा म्हणाला.
बीसीसीआय विरोधात आक्रमक भूमिका

पीसीबीच्या चेअरमनपदावर असताना रमीज राजा यांनी बीसीसीआय विरोधात वक्तव्य केली. भारताने आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिला, त्यावेळी रमीज राजाने पाकिस्तानची टीमही वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असं जाहीर केलं. या वक्तव्यानंतर रमीज राजा काही दिवसातच बॅकफूटवर आले.
या सगळ्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर रमीज राजा यांना पीसीबी चेअरमनपदावरुन हटवण्यात आलय. नजम सेठी यांनी त्यांची जागा घेतली आहे. रमीज राजा यांच्यावर काही खेळाडूंनी आरोप केले होते.