
सध्या क्रिकेट विश्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अखेरचा अंतिम सामना हा 26 मे रोजी होणार आहे. त्यानंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि विंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. एकूण 29 दिवसांमध्ये 55 सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. वर्ल्ड कपसाठी एकूण 20 संघांना 1 मे पर्यंत सर्व खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. एप्रिलच्या अखेरपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच 25 मे पर्यंत खेळाडूंच्या नावांमध्ये आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करता येईल. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या विश्वासू सूत्रांनी पीटीआला दिली.
पीटीआयच्या वृत्तानुसार,टीम इंडियाची निवड एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात केली जाईल. तोवर आयपीएलचा पहिला टप्पा संपलेला असेल. त्यामुळे निवड समितीला कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही, हे समजून घ्यायला फायदेशीर ठरेल. खेळाडूंचा फिटनेस आणि कामगिरी या निकषांवर निवड समितीचा मार्ग आणखी मोकळा होईल. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी ही 19 मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होईल. तसेच ज्या खेळाडूंची टीम आयपीएल प्लेऑफसाठी क्वालिफाय होणार नाहीत, त्यांनाही सोबत पाठवलं जाईल”.
टी 20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीने 20 संघ 4 ग्रुपमध्ये विभागले आहेत. त्यानुसार एका ग्रुपमध्ये 5 संघ आहेत. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये पाकिस्तान, आयर्लंड, कॅनेडा आणि यूएसएचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान आहे. सी ग्रुपमध्ये न्यूझीलंड, 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, यूगांडा आणि पापुआ न्यू गुनिया आहे. तर डी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ टीम आहे.