
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड क्रिकेट टीमने सुपर 8 फेरीत मंगळवारी 24 फेब्रुवारीला पाकिस्तानवर मात केली. इंग्लंडचा हा सुपर 8 फेरीतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. इंग्लंडने यासह सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याची कामगिरी केली. त्यानंतर बुधवारी 25 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारा सुपर 8 फेरीतील सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक असल्याने चाहत्यांचं निकालाकडे लक्ष असणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध झिंबाब्वे सामन्याची प्रतिक्षा आहे.
भारत विरुद्ध झिंबाब्वे दोन्ही संघांनी साखळी फेरीत अजिंक्य राहत अप्रतिम कामगिरी केली. मात्र टीम इंडिया आणि झिंबाब्वे सुपर 8 मध्ये विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्ध होणार सामना करो या मरो असा आहे. त्यात हा सामना चेन्नईत होत आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना अतिशय प्रतिष्ठेचा झाला आहे. तसेच झिंबाब्वेनेही साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला झटका दिलाय. त्यामुळे टीम इंडिया झिंबाब्वेला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्यामुळे झिंबाब्वेच्या तुलनेत भारतावर या सामन्याच अतिरिक्त दबाव असणार आहे.
उभयसंघातील सामना गुरुवारी 26 फेब्रुवारीला चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. सेमी फायनलच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर दोन्ही संघांसाठी विजय मिळवणं बंधनकारक आहे. मात्र कोणत्या तरी एका संघाचं पराभवासह पॅकअप होणार हे निश्चित आहे. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय? हे जाणून घेऊयात. पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हा सामना झाला नाही तर टीम इंडिया स्पर्धेतून जवळपास बाहेर होणार.
सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळेल. तसेच भारत आणि झिंबाब्वे दोन्ही संघांनी सुपर 8 फेरीतील पहिला सामना मोठया फरकाने गमावला आहे. त्यामुळे आधीच सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. त्यात पावसाने खोडा घातला तर पॅकअप निश्चित आहेत.
हवमानाची माहिती देणाऱ्या एक्युवेदरनुसार, चेन्नईत गुरुवारी दुपारी पाऊस होण्याची शक्यता आहे. चेन्नईत दिवसात पाऊस होण्याची 25 टक्के शक्यता आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यास त्याचा खेळपट्टीवरही परिणाम होईल. तसेच सामन्याला विलंबाने सुरुवात झाल्यास पूर्ण 20 षटकांचा खेळ होणार नाही हे देखील स्पष्ट आहे. अशात दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरेल.
चेन्नईतील खेळपट्टीवर सुरुवातीला फटकेबाजी करणं सोपं आहे. मात्र फिरकीपटूंसमोर फलंदाजांचा कस लागणार आहे. सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा 180-190 धावांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. तसेच विजयी धावांचा पाठलाग करताना संयमाने आणि विचारपूर्वक फटकेबाजी करावी लागेल. त्यामुळे कोणता संघ सरस ठरणार?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.