
टीम इंडियासाठी गुरुवार 26 फेब्रुवारी निर्णायक दिवस होता. गुरुवारी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्याने भारताला सेमी फायनलच्या हिशोबाने फार मोठी मदत झाली. भारताने त्यानंतर सुपर 8 मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर 72 धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं. ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रुपमधून एका जागेसाठी 2 भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चुरस आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला सेमी फायनलच्या हिशोबाने एक चुकही चांगलीच महागात पडू शकते.
भारताने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वे विरुद्ध 256 धावांचं डोंगर उभारला. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाला इथवर पोहचवण्यात पहिल्या 6 फलंदाजांनी योगदान दिलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिंबाब्वेला ओव्हरमध्ये 6 झटके देत 184 धावांवर रोखलं. भारताने यासह 72 धावांनी सामना जिंकत आपलं आव्हान कायम ठेवलं.
दक्षिण आफ्रिकेने विंडीजवर विजय मिळवल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरूद्धच्या विजयामुळे भारताचं उपांत्य फेरीच्या हिशोबाने समीकरण सोपं झालं. त्याआधी भारतासाठी उपांत्य फेरीचं समीकरण जर तरचं आणि अवघड होतं. भारतासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने अमूक धावांनी-विकेट्सने विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरुद्धच्या विजयामुळे भारताला आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी फक्त विजय मिळवायचा आहे.
टीम इंडियाने झिंबाब्वेला पराभूत करत 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. आता विंडीजला पराभूत केलं की टीम इंडियाच्या खात्यात 4 गुण होतील. टीम इंडिया यासह सेमी फायनलमध्ये पोहचेल. टीम इंडिया यासह ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरेल.
दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आता हा सामना जिंकून कोणता संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार?याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.